मुंबई: प्रतिनिधी
राज्यातदील दुष्काळी परिस्थितीवर पत्रकार पी.साईनाथ यांचे दुष्काळ आवडे सर्वांना एक पुस्तक असून त्या धर्तीवर आता लॉकडाऊन आवडे सरकारला असे झाले आहे. गेल्यावर्षीच्या परिस्थितीत आणि आताच्या परिस्थितीत खूप फरक असल्यानेच आपण दहिहंडी साजरी करण्यास सांगितल्याचे सांगत राज्यातील सगळ्या गोष्टी सुरु आणि मंदिर ?
मंदिर उघडली पाहिजेत अन्यथा मनसेकडून घंटानाद आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी दिला.
मनसेकडून राज्यात ठिकठिकाणी राज्य सरकारने परवानगी नाकारली असतानाही दहीहंडीचे उत्सव साजरे केले. त्या अनुंषगाने आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
नारायण राणे यांनी जन आशीर्वाद यात्रा काढली. यावेळी शिवसेना आणि भाजपमध्ये हाणामाऱ्या झाल्या. तेव्हा कोरोना नव्हता का? जन आशीर्वाद यात्रा आणि हाणामाऱ्यांवेळी नियम कुठे गेले? असा सवाल उपस्थित करून ते पुढे म्हणाले की, कोरोनाचे निर्बंध मुंबईतच का? बाहेरच्या राज्यांचं काय? जन आशीर्वाद यात्रा चालली तेव्हा तुमचा लॉकडाऊन नाही. सण आल्यावर लॉकडाऊन. सणांतून फक्त रोगराई पसरते. यात्रेतून नाही. यांच्या मेळाव्यातून आणि हाणामाऱ्यातून कोरोनाची लाट पसरली नाही. यांना पाहिजे तेवढं सुरू करतात.
सर्व गोष्टी सुरू आहेत. यांचे मेळावे सुरू आहेत. भास्कर जाधवच्या मुलाने अभिषेक सुरू केला. त्यांना मंदिरं सुरू. आमच्यासाठी नाही. क्रिकेट सुरू आहे. बाळासाहेबांच्या नावाने हडप केलेल्या महापौर बंगल्यावर बिल्डरांच्या गाड्या कमी झाल्या नाहीत. त्यामुळे सणांवरच बंधन का?, असा सवाल त्यांनी केला.
मंदिरं उघडली गेलीच पाहिजे. आजचा दिवस होऊ दे, माझ्या लोकांच्या बैठका घेणार आहे. मंदिरं सुरू करा नाही तर मंदिरांसमोर घंटनाद करू. नियम लावायचे तर सर्वांना समान नियम लावा. याला एक त्याला एक असं करून चालणार नाही. यांची बाहेर पडायला फाटते याला आमचा काय दोष?, अशी टीका त्यांनी केली.
ठाण्यात परप्रांतिय फेरीवाल्याने अधिकाऱ्यावर हल्ला केला. पोलिसांकडून ज्या दिवशी सुटेल त्यादिवशी आमच्याकडून मार खाईल. यांची मस्ती उतरवली पाहिजे. यांची सर्व बोटं छाटली जातील. फेरीवाला म्हणून फिरता येणार नाही तेव्हा यांना कळेल. सरकार कशासाठी आहे? सरकारने यावर बंधनं आणली पाहिजेत अशी मागणी करत यांना भीती काय आहे हे पोलिसातून बाहेर आल्यावर कळेल, असा इशाराही त्यांनी दिला.