मुंबईः प्रतिनिधी
जे कधी घराच्या बाहेर पडले नाहीत, ते आता कोलकात्यापासून लोकांच्या फ्लॅटवर जाऊ लागले आहेत. या पत्रकार परिषदेतील काही नेते ईव्हीएम बाबत बोलत आहेत. त्यांनी कधीच निवडणूक लढवलेली नाही. ज्यांनी कधी निवडणूक लढवली नाही त्यांनी आधी निवडणूक लढवून दाखवावी. तसेच नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणूकीत ज्यांनी निवडणूकच लढविली नाही त्यांनी ईव्हीएमवर बोलावे यातच सगळे आल्याचे शालेय शिक्षण मंत्री आशिष शेलार यांनी राज ठाकरे यांना टोला लगावत आधी निवडणूक लढवावी मगच ईव्हीएमबाबत बोलावे असे आव्हानच त्यांनी दिले.
ईव्हीएम ऐवजी बँलेट पेपरवर निवडणूका घ्याव्यात या मागणीसाठी मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्यासह काँग्रेस, राष्ट्रवादी, स्वाभिमानी शेतकरी संघटना, डावे पक्ष एकत्रित येत त्या विरोधात २१ ऑगस्ट रोजी मोर्चा काढणार असल्याची घोषणा केली. त्यावर प्रतिक्रिया देताना शेलार बोलत होते.
निवडणूक आयोगाला घटनात्मक अधिकार असून निवडणुका बॅलेट पेपरवर घ्याव्या, की ईव्हीएमवर हे आयोगानेच ठरवायचे आहे. घटनात्मक अधिकार असलेल्या आयोगाबाबत अशाप्रकारे जनमानसात संभ्रम निर्माण करणे हे अत्यंत चुकीचे आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि विरोधी पक्षांनी ईव्हीएमवर टीका करत आंदोलन छेडले आहे. यावर शेलार यांनी टीका केली आहे. पत्रकार परिषद घेऊन जे नेते ईव्हीएमच्या विरोधात बोलत आहेत, त्यापैकी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, छगन भुजबळ आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात हे ईव्हीएम द्वारेच निवडून आले आहेत. त्यांनी आधी आपल्या आमदारकीचा राजीनामा द्यावा आणि मगच ईव्हीएम बाबत बोलावे, असे आव्हानच त्यांनी दिले आहे.
जेव्हा हे सगळे निवडून येतात, तेव्हा ईव्हीएम चांगले आणि पराभव झाला की ईव्हीएमवर खापर फोडायचे. हा प्रकार म्हणजे नाचता येईना अंगण वाकडे असा आहे. जनतेने जो कौल दिला आहे त्याचाही हे अपमान करीत असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना दिलेल्या सल्याप्रमाणे या सर्वांनी आत्मचिंतन करायची गरज असल्याचा खोचक सल्लाही त्यांनी यावेळी दिला.
Tags ajit pawar ashish shelar bjp chhagan bhujabal congress mns ncp raj thackeray
Check Also
गडकरींकडून आदर्श आचारसंहितेचा भंग, गडकरी व आमदार मोहन मतेंवर गुन्हा नोंदवा
भारतीय जनता पक्ष सर्वकायदे धाब्यावर बसवून सातत्याने आचारसंहितेचा भंग करत आहे. भारतीय जनता पक्षाचे नागपूर …