मुंबई: प्रतिनिधी
रायगड किल्ला केंद्राकडून राज्याच्या ताब्यात घेऊन शिवरायांच्या काळात हा किल्ला जसा होता तसा तो पुन्हा बनविण्याची मागणी राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे केली.
जागतिक पर्यटन दिनानिमित्त मुख्यमंत्र्यांच्या वर्षा शासकीय निवासस्थानी झालेल्या या कार्यक्रमास महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे, प्रधान सचिव वल्सा नायर–सिंह, पर्यटन संचालक दिलीप गावडे, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे (एमटीडीसी) व्यवस्थापकीय संचालक आशुतोष सलील, पर्यटन सहसंचालक डॉ. धनंजय सावळकर आदी मान्यवर उपस्थित होते. अन्न व नागरी पुरवठा मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ, पर्यटन राज्यमंत्री तथा रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री अदिती तटकरे, खासदार श्रीरंग बारणे आदी मान्यवर ऑनलाईन सहभागी झाले होते.
रायगड किल्ल्याच्या पुर्नसंवर्धनासाठी राज्य सरकारने खासदार छत्रपती संभाजीराजे यांच्या अध्यक्षतेखाली स्वतंत्र प्राधिकरणाची स्थापना केली असून या प्राधिकरणाच्या मार्फत जुने वैभव आणण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. राज्य सरकारकडून या प्राधिकरणाला ६०० कोटी रूपयांचा निधी देण्यात आल्याचेही मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी सांगितले.
भुजबळ पुढे म्हणाले की, नाशिक हे देशातील प्रमुख तीर्थक्षेत्र आहे. इथे पर्यटक आल्यानंतर तो फक्त देवदर्शन करुन परत न जाता त्याने काही दिवस इथे रहावे यासाठी परिसरातील अनेक पर्यटनस्थळांचा विकास करण्यात येत आहे. परिसरातील शिर्डी, त्र्यंबकेश्वर, सप्तश्रुंगीगड आदी पर्यटनस्थळांची कनेक्टिव्हीटी वाढविण्यात आली आहे. आज सुरु करण्यात आलेले ग्रेप पार्क रिसॉर्ट आणि बोट क्लबमुळे नाशिकच्या पर्यटनास मोठी चालना मिळेल अशी आशा आहे.