मुंबई: प्रतिनिधी
मुंबईहून गोव्याला जाणाऱ्या प्रवाशी जहाजावर पार्टी करण्याच्या निमित्ताने ड्रग्ज बाळगल्याप्रकरणी बॉलीवूडमधील एका प्रसिध्द अभिनेत्याच्या मुलासह त्याचा मित्र आणि एका मुलीला एनसीबी कोठडी सुनावण्यात आली आहे. काल रात्री ८ जणांना प्रवाशी जहाजातून एनसीबीने अटक केली होती. त्यानंतर आज दिवसभर त्यांची चौकशी केल्यानंतर यापैकी तीन जणांवर यामध्ये आर्यन खान, अब्बाज मर्चट आणि दिल्लीतील मुनमुन या तिघांवर गुन्हे दाखल करत अटक केली. मात्र या पार्टीचा आयोजकावर काय कारवाई केली याबाबतची माहिती अद्याप पुढे आली नाही.
एनसीबीने अटक केल्यानंतर या तीघांनाही पोलिसांनी किल्ला कोर्टात हजर केले. त्यावेळी अटक करण्यात आलेल्यांच्यावतीने प्रसिध्द वकिल माने-शिंदे यांनी युक्तीवाद केला. यावेळी पोलिसांच्यावतीने सरकारी वकीलांनी या तिघांच्याही एनसीबी कोठडीची मागणी केली.
त्यास माने-शिंदे यांनी विरोध करत जामीन देण्याची मागणी केली. मात्र किल्ला कोर्टाने जामीन देण्यास नकार देत एक दिवसाची एनसीबी कोठडी सुणावली. सुणावनीनंतर पोलिसांनी या तिघांनाही पुन्हा एनसीबी कार्यालयात नेले.
दरम्यान, आर्यन खान याने आपल्याला पार्टीसाठी खास पाहुणा म्हणून बोलविण्यात आल्याचे सांगत तेथील पार्टीत ड्रग्ज सेवन करण्यासाठी सोबत नेले होते. मात्र तेथे गेल्यावर त्याचे सेवन केले नसल्याचे स्पष्ट केले. तसेच पार्टीसाठी ८० हजार रूपयांचे तिकीट ठेवण्यात आले होते. मात्र या तिकीटाच्या विक्रीसाठी माझ्या नावाचा गैरवापर करण्यात आल्याची कबुली दिल्याचे सांगण्यात येत आहे.
त्याचबरोबर पार्टीसाठी लागणारे ड्रग्ज कॉन्टॅक्ट लेन्सच्या बॉक्समधून आणण्यात आल्याचेही सांगण्यात येत आहे.
पार्टीसाठी फक्त ८ जण उपस्थित कसे?
एनसीबीने तीन दिवसांपासून पाळत ठेवून या क्रुजवर पार्टीसाठी आलेल्यांवर कारवाई केल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र एखादी पार्टी विशेषत: बॉलीवूडशी संबधित असलेल्यांची किंवा रेव्ह पार्टी जरी म्हटले तरी किमान २५ ते ३० जण हजर राहतात. तसेही पाह्यल्या गेले तरी कोविड काळामुळे मागील दिड वर्षापासून बंधनात राहीलेल्या अनेकांना कधी एकदा पूर्वीसारखं मोकळं-ढाकळं मस्त एन्जॉय करण्याचा मोह अनेकांना आहे. मात्र ८० हजाराचे तिकीट लावूनही फक्त ८ जण या पार्टीला कसे हजर झाले? याचा तार्किक उलगडा व्हायला तयार नाही. त्याचबरोबर या पार्टीसाठी कोणी मुलींच्या पर्समधून तर कोणी बुटाच्या टाचेत लपवून ड्रग्ज आणल्याचे सांगण्यात येत आहे. या ८ जणांमध्ये असे कितीजणांनी अशा पध्दतीने ड्रग्ज आणले किंवा या तिघांनीच असे ड्रग्ज आणले असेल तर त्याचे प्रमाण किती ग्रॅम आणि वजनामध्ये होते यावर अद्याप प्रकाश पडलेला नाही म्हणण्यापेक्षा त्याची माहिती अद्याप बाहेर आली नाही.
याशिवाय सर्वात महत्वाचे म्हणजे जर एनसीबीला जर या पार्टीची आधीपासून माहिती होती तर या पार्टीच्या आयोजकाचीही माहिती एनसीबीला निश्चितच असायला हवी. मात्र या तिघांना अटक करताना किंवा त्यावेळी हजर असलेल्या ८ जणांमध्ये पार्टीचा आयोजक नव्हता का? आणि जर तो तिथे होता तर त्याला का अटक करण्यात आली नाही? किंवा मुळ पार्टीच्या आयोजकास अद्याप का अटक करण्यात नाही ? असे काही प्रश्न एसीबीच्या कारवाईच्या निमित्ताने उपस्थित होत आहेत.