मुंबईः विशेष प्रतिनिधी
करोना व्हायरसमुळे इटलीतील रोम येथे १०२ भारतीय अडकले असून यात महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगली येथील ४४ तर मुंबईतील २ दोघांचा समावेश आहे. या नागरीकांना परत आणण्यासाठी राज्य सरकारने केंद्राशी संपर्क साधून वैद्यकीय पथक पाठवून परत आणावी अशी मागणी काँग्रेस नेते तथा माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केली.
विधानसभेत करोना व्हायरसच्या वाढत्या संकटाबद्दल भाजपा नेते सुधीर मुनगंटीवार यांनी औचित्याच्या मुद्याद्वारे उपस्थित केला. त्यावेळी पृथ्वीराज चव्हाण, अतुल भातखळकर, राम कदम आदींनी हा मुद्दा उपस्थित केला.
या आजारामुळे इटलीत हिंडण्याफिरण्यावर बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे हे सर्व नागरीक तेथे अडकून पडले आहेत. या नागरीकांना परत आणण्याच्या अनुषंगाने परराष्ट्र मंत्रालयाशी संपर्क झाला असून त्यांच्याकडून लवकरच वैद्यकीय मदतचे पथक रोम येथे पाठविणार असल्याचे सांगण्यात आले. मात्र याप्रश्नी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी लक्ष घालून या नागरीकांना परत आणण्याच्या अनुषंगाने योजना आखावी आणि मदत पाठविण्यासंदर्भात कायमस्वरूपी सेलची स्थापना करावी अशी मागणी त्यांनी केली.
चव्हाण यांच्या पाठोपाठ भाजपा आमदार अतुल भातखळकर यांनीही त्यांच्या कांदीवली पूर्व मतदारसंघातील ४ जण परदेशात अडकले असल्याचे सांगत त्यांनाही देशात परत आणण्यासंदर्भात सरकार पावले उचलली पाहीजे अशी मागणी केली.
तर राम कदम यांनी मुंबईतील २०० जण परदेशात अडकल्याचे सांगितले.
राज्यातील जवळपास ८५० ते एक हजार नागरीक हे खाजगी कंपनीमार्फत परदेशी पर्यटनाला गेले आहेत. ते ही आता मुंबईत परतणार असून या आजारामुळे ते परदेशातच अडकले आहेत. ते जेव्हा येथील तेव्हा त्यांची तपासणी करण्याची गरज असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.