मुंबईः विशेष प्रतिनिधी
राज्यातील सत्ता स्थापन करण्यासाठी कोणत्याही राजकिय पक्षाने मुदतीत संख्याबळ दाखविले नसल्याने राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली. मात्र माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना या पदावर असलेल्या व्यक्तीसाठीच्या सवलतींचा मोह सोडवेनासा झाला असून सरकारच्या अखत्यारीतील माहिती व जनसंपर्क विभागाच्या सहा अधिकारी-कर्मचाऱ्यांची त्यांच्या प्रसिध्दीच्या कामासाठी वर्षा बंगल्यावर राबत असल्याची धक्कादायक माहिती उघडकीस आली आहे.
सत्ता स्थापन करण्यासाठी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसला अनुक्रमे बोलावले. परंतु या दोन्ही राजकिय पक्षांनी मुदतीत आपले पुरेसे संख्याबळ सादर करण्यास असमर्थता दाखविली. दरम्यानच्या कालावधीत राज्यपालांनी देवेंद्र फडणवीस यांची काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून नियुक्ती केली होती. भारतीय संविधानातील कायदा-३५६ अन्वये राष्ट्रपती राजवट राज्यात लागू झाल्यानंतर सरकारमधील सर्व राजकिय नियुक्त्या तसेच मुख्यपदी पदाचा कार्यकाल लगेच संपुष्टात येतो. तसेच सरकारमधील राजकिय नियुक्त्यांना दिलेल्या सवलती, दालने, बंगले, सदनिका तातडीने रिक्त करावी लागत असल्याचे कलम-३५६मधील तरतूदीनुसार दिसून येते.
परंतु, राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्याच्या मुख्यमंत्री पदावरील व्यक्तीसाठी असलेले वर्षा हे शासकिय निवासस्थान अद्याप रिक्त केलेले नाही. तसेच मुख्यमंत्री पदावरील व्यक्तीच्या भेटीसाठी अनेक देशी, परदेशी, पाहूणे येत असतात. तसेच मुख्यमंत्र्यांकडून राज्याच्या विकासाच्या अनुषंगाने अनेक बैठका होत असतात. या बैठकांची आणि बैठकांमधील निर्णयाची माहिती राज्यातील जनतेला व्हावी यासाठी राज्य सरकारच्या अखत्यारीत असलेल्या माहिती व जनसंपर्क विभागाकडून अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली जाते. राजवट लागू झाल्यानंतर या सर्व अधिकारी-कर्मचाऱ्यांना पुन्हा मुळ विभागात पाठविले जाते. मात्र माहिती व जनसंपर्क विभागाने या कर्मचाऱ्यांना वर्षा बंगल्यावर फडणवीस यांच्या दिमतीसाठी तसेच ठेवण्यात आल्याची माहिती मुख्य सचिवांच्या कार्यालयातील एका उच्च पदस्थ व्यक्तीने दिली.
तसेच माजी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या दैनंदिन बैठका, गाठी-भेटी यांची प्रसिध्दी देण्याकरिता या विभागाकडून दोन अधिकारी, दोन फोटोग्राफर आणि दोन व्हीडीओ रेकॉर्डींग करण्यासाठी दोन कॅमेरामन यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच फडणवीस यांच्यासोबत दौऱ्याला जाण्यासाठी एक वाहन ही या कर्मचाऱ्यांच्या दिमतीला ठेवण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
याशिवाय दररोज दोन उपसंपादक, दोन शिपाई आणि एका अधिकाऱ्याला वर्तमान पत्रात आलेल्या बातम्यांची कात्रणे भल्या पहाटे येवून काढायला लावली जात आहेत. तसेच ही बातम्यांची कात्रणे दररोज पहाटे ५.४५ वाजण्यापूर्वी मंत्रालयातील माहिती व जनसंपर्क विभागातून वर्षा बंगल्यावर नित्यनेमाने पाठविण्यात येतात. तसेच त्यासाठी कल्याण, अंबरनाथ, बदलापूर, पनवेल या भागात राहणाऱ्या कर्मचाऱ्यांना भल्या पहाटेच मंत्रालयात कामकाजाला यासाठी बोलावून पुन्हा आठ तासाची नोकरी करायला लावली जात असल्याचेही त्यांनी सांगितले.
याबाबत वर्षा बंगल्यावर याबाबत प्रत्यक्ष चौकशी केली असता राज्याच्या माहिती व जनसंपर्क विभागाने अशा सहा अधिकाऱी-कर्मचाऱ्यांची माजी मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासाठी नियुक्ती केल्याचे सांगण्यात आले.
Tags bhagatsingh koshyari devendra fadnavis government of maharashtra information and publicity dept.
Check Also
सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय, उमेदवारही गोपनीयता बाळगू शकतो
देशातील प्रत्येक नागरिकांना निवडणूकीच्या कालावधीत विविध राजकिय पक्षाच्या उमेदवारांची संपत्ती किती, त्यांच्यावर गुन्हे किती, त्याची …