मुंबई : प्रतिनिधी
बांधकाम प्रकल्पांना आकारण्यात येणारा प्रिमीयम कमी करण्याचा राज्य शासन विचार करीत असून यावरून राज्य सरकारवर टीका करताना भाजपा नेते आमदार अँड आशिष शेलार यांनी राज्यात कोरोनाचा कहर आणि सत्ताधाऱ्यांचा कलेक्शनवर भर, अशा सूचक शब्दात निशाणा साधला आहे.
प्रिमीयम मधून महापालिकांना उत्पन्न मिळते मात्र राज्य शासनाने मुंबई, ठाणे, पुणे या शहरातील बांधकाम प्रकल्पांचा प्रिमीयम कमी करण्याबाबत पारेख कमिटी गठीत केली. प्रिमीयम कमी करणे कुणासाठी सुरू आहे? असा सवाल करीत त्यांनी केला.
मुंबई, ठाणे, पुणे शहरातील बिल्डरांसाठी राज्य शासन प्रिमीयम कमी करण्याचा घाट घालत आहे. त्यासाठी पारेख कमिटी गठीत करण्यात आली आहे. पण…प्रिमीयम कमी केल्याने महापालिकांचे उत्पन्न घटणार त्याचे काय? असा सवालही त्यांनी केला.
सर्वसामान्यांसाठी घराच्या किंमती कमी होणार का? त्या किती कमी होणार? रेडिरेकनरची फाईल जशी पुणे-मुंबई प्रवासात “लक्ष्मी दर्शन” करीत आली तशीच ही फाईल मंत्रालयातून कुठल्या कुठल्या “बंगल्यावर लक्ष्मीदर्शन” करीत फिरतेय? शेतकरी,श्रमिकांच्या प्रश्नांपेक्षा बिल्डरांच्या विषयात सरकारला अधिक रस का? असा प्रश्नांचा भडिमार त्यांनी करत राज्यात कोरोनाचा कहर आणि सत्ताधाऱ्यांचा कलेक्शनवर भर? असा उपरोधिक टीकाही त्यांनी केली.