मुंबईः प्रतिनिधी
लॉकडाऊन काळापासून राज्यातील सर्वसामान्य नागरिकांना वाढीव वीज बील मोठ्या प्रमाणावर येत आहेत. याप्रश्नी मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी आपल्या शिष्टमंडळासोबत आज राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेत निवेदन दिले. त्यावर राज्यपालांनी याप्रश्नी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांची भेट घेण्याचा सल्ला दिल्याची माहिती दस्तुरखुद्द राज ठाकरे यांनीच प्रसारमाध्यमांना दिली. यावेळी राज ठाकरे यांच्यासोबत मनसे नेते भाळा नांदगांवकर, माजी आमदार देसाई, अमित ठाकरे, शालीनी ठाकरे यांच्या अन्य नेते मंडळी उपस्थित होते.
राज्यातील अनेकांचे लॉकडाऊनमुळे आधीच रोजगार गेलेले असताना त्यांना वाढीव वीज बीलाचा शॉक वीज कंपन्यांकडून देण्यात येत आहे. यासंदर्भात ऊर्जा मंत्री डॉ.नितीन राऊत यांच्याशी चर्चा केली असता त्यांनी यावर लवकरच तोडगा काढणार असल्याचे आश्वासन दिले. मात्र पुढे काही झाले नाही. यासंदर्भात एमईआरसीकडे विचारणा केली तर ते राज्य सरकारकडे बोट दाखविते. त्यामुळे या प्रकरणाचा निर्णय अडलय कोठे हे कळायला मार्ग नसल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.
यासंदर्भात शरद पवार यांच्याशी प्रत्यक्ष किंवा फोनवरून चर्चा करणार असल्याचे सांगत प्रसंगी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचीही भेट घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.
राज्यपाल आणि महाविकास आघाडी यांच्यातील संबध फारसे सुमधूर राहीले नसल्याने आणि त्यात नुकतेच शरद पवार यांनी राज्यपालांना त्यांच्या कॉफीटेबल पुस्तकावरून टोला लगावल्याने त्यांनी याप्रश्नी शरद पवारांना भेटण्याचा सल्ला दिल्याची चर्चा राजकिय वर्तुळात सुरु झाली आहे.