मुंबई : प्रतिनिधी
बीडची तरूणी पूजा चव्हाण आत्महत्याप्रकरणी राज्याचे वनमंत्री संजय राठोड हे संशयाच्या भोवऱ्यात आले. तसेच भाजपाकडून राठोड यांच्या विरोधात मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची थेट मागणी केल्यानंतर अखेर मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी याप्रकरणी चौकशी करण्याची तयारी दर्शवित सत्य समोर आल्यानंतर कारवाई करणार असल्याचे आश्वासन दिले. त्यामुळे वनमंत्र्यांवर उचलबांगडीची कारवाई तुर्तास तरी होणार नसल्याचे स्पष्ट झाले.
पूजा चव्हाण प्रकरणी सखोल चौकशी होईल आणि त्यानंतर गरज असेल त्यांच्यावर योग्य ती कारवाई करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी स्पष्ट केले. ते आज नवी मुंबईतील एमटीएचएल या प्रकल्पाची पाहणी करण्यासाठी आले होते. त्यावेळी ते बोलत होते.
गेल्या काही काळात लोकांना आयुष्यातून उठविण्याचे प्रयत्न होत असल्याचे काही प्रकार झाल्याचे तसं काही होवू नये या काळजी घेतली पाहिजे. या प्रकरणाच्या चौकशीतून जे सत्य जनतेसमोर येईल त्यानंतर कारवाई केली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
दरम्यान, राष्ट्रीय महिला आयोगाकडून पूजा चव्हाण प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून या प्रकरणाचा चौकशी अहवाल सादर करण्याचे आदेश पोलिस महासंचालकांना एका पत्राद्वारे दिले आहेत.