भाजपा कार्यकर्त्ये आणि पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी आगामी विधानसभा निवडणुदरम्यान भाजपा २४० जागा लढेल, अशा आशयाचं विधान केले. तसेच फक्त ४८ जागा शिंदे गटाला देण्यात येणार असल्याचे वक्तव्य केले. त्यांच्या या विधानानंतर विविध राजकीय चर्चा सुरू झाल्या आहेत. दरम्यान, नाना पटोले यांनी या विधानवरून भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना खोचक टोला लगावला. तसेच एकनाथ शिंदेंना भाजपापासून सतर्क राहावे, असा सल्लाही त्यांनी दिला.
नागपूरमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलताना नाना पटोले यांनी यासंदर्भात प्रतिक्रिया देताना वरील चिमटा काढला.
यावेळी पुढे बोलताना नाना पटोले म्हणाले, आता तर कुठं सुरुवात झाली आहे. एकनाथ शिंदे यांचे चागलं व्हावं, अशीच आमची सदिच्छा आहे. पण भाजपा त्यांचं काय करेल हे आता सांगता येणार नाही. जे बावनकुळेंच्या पोटत होतं, तेच त्यांच्या ओठातून निघालं आहे, अशी प्रतिक्रिया दिली.
पुढे बोलताना त्यांनी एकनाथ शिंदे यांना सतर्क राहण्याच सल्लाही दिला. दोन दिवसांपूर्वीच महाविकास आघाडीच्या जागावाटपाबद्दलची खोटी बातमी पसरवण्यात आली. विशेष म्हणजे आमच्यात अशी कोणतीच चर्चा झाली नव्हती. पण चुकीच बातमी पसरवून वातावरण निर्मिती करण्यात आली. मात्र, याप्रकरणात तर स्वत: भाजपाचे प्रदेशाध्यक्ष बोलले आहेत. महत्त्वाचे म्हणजे आज त्यांनी यावरून घुमजावदेखील केला. त्यामुळे जे बावनकुळेंच्या पोटात आहे, तेच त्यांच्या ओठावर आलं आहे, हे एकनाथ शिंदे यांनी समजून घ्यावं, त्यांनी आता सर्तक राहायला हवं, असेही ते म्हणाले.
यावेळी बोलताना त्यांनी भाजपावरही टीकास्र सोडलं. भाजपा हा एक नंबरचा खोटारडा पक्ष आहे. भाजपाकडून सातत्याने लोकांची दिशाभूल करण्यात येते. भाजपाबद्दल आता लोकांमध्ये चीड निर्माण झाली आहे, अशी टीकाही त्यांनी केली.