विधान परिषद निवडणूक जाहीर झाली. मात्र या निवडणूकीत सर्वाधिक चर्चेची निवडणूक ठरत आहे ती नाशिक पदवीधर मतदारसंघाची. या निवडणूकीच्या निमित्ताने काँग्रेसने उमेदवार जाहीर करूनही सदर उमेदवाराने आपला उमेदवारी अर्ज न भरता मुलगा सत्यजीत तांबे यास अपक्ष उमेदवार म्हणून उमेदवारी अर्ज भरायला लावला. तसेच पाठिंब्यासाठी भाजपाकडे मदत मागणार असल्याचे वक्तव्य केले. त्यामुळे राज्यातील वातावरण चांगलेच तापले. या पार्श्वभूमीवर वंचित प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी मोठे वक्तव्य करत देवेंद्र फडणवीस यांना आवडणार नाही पण भाजपाचे पुढील मुख्यमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील हे असतील असे मोठे वक्तव्य केले. त्यामुळे भाजपामध्ये एकच खळबळ माजली आहे.
नाशिकमधील राजकीय नाट्यावरून प्रकाश आंबेडकर म्हणाले, भाजपाकडून मोठी खेळी सूरू असून राधाकृष्ण विखे पाटील यांना मुख्यमंत्रीपदाचा चेहरा म्हणून पुढे करण्याचा प्रयत्न भाजपाचा आहे.
प्रकाश आंबेडकर हे औरंगाबादेत पत्रकारांशी बोलत होते. यावेळी त्यांनी ठाकरे गटाशी होणाऱ्या युतीबाबतही भाष्य केलं.
विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाकडून वेगळी खेळी सूरू आहे. भाजपा राधाकृष्ण विखे पाटील यांना मुख्यमंत्रीपदाचा चेहरा म्हणून पुढे करण्याच्या प्रयत्नात आहे. मी जे बोलतो आहे, ते देवेंद्र फडणवीसांना आवडणार नाही, पण राधाकृष्ण विखे पाटील हे भाजपाच्या मुख्यमंत्री पदाचा चेहरा होऊ शकतात, अशी शक्यताही त्यांनी यावेळी वर्तविली.
तसेच नगरमध्येही मोठं राजकारण सुरू असून बाळासाहेब थोरतही मुख्यमंत्री पदासाठी प्रयत्न करत आहेत, असा दावाही त्यांनी केला.
पुढे बोलताना प्रकाश आंबेडकर म्हणाले, आगामी मुंबई महापालिकेच्या निवडणुका आम्ही (ठाकरे गट) सोबत लढणार आहोत. त्यासाठी जागा वाटपही निश्चित झाले आहे. तसेच आमची युती २०२४ मध्ये होणाऱ्या लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीतही कायम राहणार आहे. या युतीत राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस असतील का? याबाबत उद्धव ठाकरे निर्णय घेतील, असेही स्पष्ट केले.
यावेळी त्यांनी काँग्रेसवरही टीकास्र सोडले. ‘काँग्रेसवर भरोसा ठेवू नये हे मी उद्धव ठाकरे यांना सांगितले आहे. पृथ्वीराज चव्हाण हे खोटारडे व्यक्ती आहेत. त्यांनी मला मंत्री बनवण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, ते पूर्ण केले नाही, असेही प्रकाश आंबेडकर म्हणाले.