Breaking News

मुख्यमंत्री ठाकरेंच्या मेहुण्यावरील धाडीवरून केद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले… मंत्र्याला अडचणी आणतो तो मेहुणा अशी कबुली दिली

काही दिवसांपूर्वी राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचे मेहुणे श्रीधर पाटणकर यांच्या मालमत्तांवर ईडीने धाड टाकत ६ कोटी ४५ लाख रूपयांची मालमत्ता जप्त केले. ईडीने मुख्यमंत्री पदावर असलेल्या व्यक्तीच्या जवळच्या नातेवाईकावर धाड टाकत कारवाई केल्याची बहुधा ही पहिलीच घटना असावी. यापार्श्वभूमीवर सांगली येथील कार्यक्रमात बोलताना केंद्रीय मंत्री तथा भाजपा नेते नितीन गडकरी म्हणाले की, मंत्र्यांना अडचणीत कोण आणतं माहित आहे का? तर त्याचा मेहुणा नाही तर चहा पेक्षा किटली गरम त्याचे खाजगी सचिव असे सांगत अप्रत्यक्ष मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्यासोबतच्या घटनेवर भाष्य केले.

तसेच मी माझ्या मेव्हण्याला तुझे काम असेल तरच माझ्याकडे ये असे सांगितले. लोकांचे काम घेऊन नेतेगिरी करण्याचा तुझा संबंध नाही. तू या भानगडीत पडायचे नाही असा दमही मेव्हुण्याला भरल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

केंद्रीय रस्ते वाहतुक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी हे आज सांगली दौऱ्यावर आहेत. नितीन गडकरी यांचे सांगली शहरात तीन कार्यक्रम असून भिवघाट येथे गडकरी यांचा सत्कार करण्यात येणार आहे. शेतकरी मेळाव्यासही नितीन गडकरी उपस्थित राहणार आहेत. गडकरी यांच्या हस्ते दोन राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पाचे लोकार्पण करण्यात आले. सांगली ते सोलापूर या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक १६६ मधील बोरगाव ते वाटंबरे दरम्यानच्या ५२ किलोमीटर लांबीच्या चौपदरीकरणाचा यामध्ये समावेश आहे. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ९६५ वरील सांगोला ते सोनंद ते जत या मार्गाचा लोकार्पण सोहळा आज पार पडला.

यावेळी बोलताना पुणे ते बंगळुरू राष्ट्रीय महामार्ग पावसाळ्यात बंद पडतो. भविष्यात आता या मार्गावर हे संकट येणार नाही. आपण पुणे ते बंगळूरू नवा राष्ट्रीय महामार्ग  बांधण्याचे निश्‍चित केले असून ४० हजार कोटी रुपयांचा नवा रस्ता खंडाळा, फलटण, खानापूर, तासगाव, कवठेमहांकाळ या दुष्काळी टापूतून जाईल. भविष्यात मुंबई पुणे रस्ता पुण्याच्या रिंगरोडला जोडल्यानंतर हाच मार्ग मुंबई ते बंगळुरू असा होईल, अशा घोषणा केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी केली.

त्याचबरोबर आपण राष्ट्रीय महामार्गावर १२० स्पीडने गाडी चालविण्याची परवानगी देणार असल्याचे सांगत जर राज्यात मंत्री असतो तर आतापर्यत मुंबईत तीन मजली उड्डाणपूल बांधला असता असे सांगत मुंबईतल्या वाढत्या वाहतूक कोंडीच्या प्रश्नावर नाराजी व्यक्त केली.

त्याचबरोबर सोलापूर-बंगलोर महामार्गावर दोन्हीबाजूला जर झाडे लावली तर ग्रीन हायवे निर्माण होईल आणि त्याचा फायदा प्रदुषण कमी होण्यास मदत होईल आणि बघणाऱ्यालाही आल्हाददायक अनुभव येईल असेही ते म्हणाले.

Check Also

वंचितचा आरोप, सत्ताधारी पक्षाकडून वंचितच्या उमेदवारांना धमकावण्याचा प्रयत्न

वंचित बहुजन आघाडीचे जळगावचे उमेदवार प्रफुल्ल लोढा यांनी काही दिवसांपूर्वी उमेदवारी अर्ज मागे घेतला आणि …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *