सध्या मुंबई दौऱ्यावर असलेले केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी उध्दव ठाकरे यांनी आपल्याला धोका दिल्याचा आरोप करत निवडणूकी आधी मोदी आणि फडणवीस यांच्या नावावर मते मागितली. निकाल हाती आल्यानंतर मात्र त्यांनी विश्वासघात केल्याचाही आरोप केला. तसेच मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाचं लक्ष्य १५० जागा जिंकण्याचं असेल, अशी घोषणा केली. तसेच शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा थेट उल्लेख करत त्यांनी आपल्याला धोका दिला. केवळ दोन जागांसाठी त्यांनी २०१४ मध्ये युती मोडली. या आरोपानंतर शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी अमित शाह यांच्यावर टीकेला प्रत्युत्तर दिले. यावेळी अरविंद सावंत म्हणाले भाजपाचा राज्यात विस्तार आणि केंद्रात केलेले सहकार्य यामुळे शिवसेनेच्या उपकाराची जाणीव ठेवा, असा खोचक शाह यांना टोला लगावला.
भाजपाचं सगळं तसंच असतं, त्यांचं नुसतं मिशन असतं, आज काय लोटस मिशन, परवा काय दुसरं मिशन असतं. त्यामुळं मूळ प्रश्न गहाळ असतात. अनेक गोष्टींपासून ते दूर आहेत. जनतेच्या प्रश्नांपासून दूर आहेत, मराठी माणसांच्या अस्मितेपासून ते दूर आहेत, असेही ते म्हणाले.
२०१९ च्या निवडणूकांपूर्वी सेनेला असेच अव्हान देण्यात आले होते. मात्र, निकाल समोर येताच हेच अमित शाह हे मातोश्रीवर दाखल झाल होते. त्यानंतरच लोकसभा निवडणूक एकत्र लढण्याचा निर्णय झाला होता. त्या दरम्यानच, विधानसभा निवडणूकांचे स्वरुप कसे असणार हे देखील ठरल्याचे सांगत एवढेच नाही तर जागा वाटपही कसे असणार निश्चित झाले होते. पण आकड्यांचा खेळ जुळला नाही आणि भाजपानेच शिवसेनेला धोका दिल्याचा आरोप त्यांनी केला.
शिवसेना आणि मुंबई महानगरपालिका यांचं नातं दृढ आहे. कुणी कितीही वल्गना करु द्यात. बंगाल, पंजाब आणि दिल्लीत भूईसपाट झाले तेच मुंबईत होणार, मुंबईकर सूज्ञ आहेत. मुंबईकरांच्या आरोग्यासाठी सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल मुंबई महापालिका चालवते, ते उद्धव ठाकरेंच्या दूरदृष्टीमुळं सुरु आहे. पोटात एक आणि ओठात एक ही पद्धत कुणाकडे आहे याची कल्पना सर्वांना आहे. अमित शाह त्यावेळी हरियाणाला का गेले होते. महाराष्ट्रात प्रश्न निर्माण झाला होता. तुम्ही शब्द दिल्याचं उद्धव ठाकरे सांगत होते. त्यावेळी तुम्ही महाराष्ट्रात न येता हरियाणाला गेलात. नंतर सहा महिन्यांनी बोलला होता ते ही गझनी सारखं अशी टीकाही त्यांनी केली.
सुरुवातीच्या काळात भाजपाला राज्यात शिवसेनेची साथ मिळाली म्हणूनच हे आजचे चित्र आहे. एवढेच नाहीतर पंतप्रधान मोदी ज्या पदावर आहेत त्यामध्येही देखील शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे मोठे योगदान राहिलेले आहे. काळाच्या ओघात आणि सत्तेपुढे याची त्यांना जाणीव राहिलेली नाही. किमान उभारीच्या काळात केलेले सहकार्य आठवूण तरी त्यांनी शिवसेनेबद्दल वक्तव्य करणे गरजेचे आहे अशी आठवण त्यांनी करून दिली.
पण बाळासाहेब ठाकरे म्हणत होते, की तुम्ही राष्ट्र बघा आम्ही राज्य सांभाळतो, पण सत्तेची हावस त्यांना स्वस्त बसू देत नव्हती, असा टोलाही त्यांनी शाह यांना लगावला.