मराठी ई-बातम्या टीम
राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांनी सुरु केलेले आंदोलन आता भरकटत आहे. त्यामुळे त्यांनी आंदोलन आणखी भरकटण्याऐवजी मागे घ्यावे असे आवाहन एसटी महामंडळाचे अध्यक्ष तथा राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी करत आंदोलन करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर करण्यात आलेली कारवाई मागे घेण्याबाबत चार संधी देण्यात आली. पण ते हजर झाले नाहीत. परंतु आता त्यांच्यावरील कारवाई मागे घेण्यात येणार नसल्याचे ठाम निर्धार त्यांनी यावेळी व्यक्त केला.
परिवहन मंत्री अनिल परब हे आज सोलापूर दौऱ्यावर असून तेथे त्यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना वरील माहिती दिली.
आम्ही आमच्याकडून २ नाही, तर ४ पावले पुढे गेलो. मी एसटी कामगारांवर कारवाई होणार नाही यासाठी चारवेळा संधी दिली होती. याबाबतीत वेळोवेळी आवाहन करूनही एसटी कामगार कामावर परतले नव्हते. आता कर्मचाऱ्यांनी अगोदर कामावर रुजू व्हावं त्यानंतर कोणाशीही बोलणी करायला सरकार तयार असल्याचे त्यांनी सांगितले.
ज्या एसटी कामगारांवर आता कारवाई करण्यात आलेली आहे ती माघारी घेण्यात येणार नाही. दिवाळीच्या अगोदर आणि आत्तापर्यंत सरकारने ५० एसटी कर्मचाऱ्यांच्या गटांना भेटी दिल्या आहेत. २८ युनियनच्या कृती समितीबरोबर करारही केला आणि बाकीच्या मागण्या मान्य केल्या. यानंतरही ते आंदोलन मागे घेत नाहीत याचा अर्थ एसटी कामगारांचे आंदोलन चुकीच्या दिशेने भरकटत चाललेले असल्याचे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.
दरम्यान, गुणरत्न सदावर्ते यांच्या जीवाला धोका या हवेतल्या गोष्टी आहेत. त्यांच्या जर जीवाला धोका असेल, त्यांनी रीतसर पोलीस संरक्षण मागावे. शासन त्यांना संरक्षण देईल असेही त्यांनी सांगितले.