शिवसेनेतील बंडाळीचा आज दुसरा दिवस असून कालच्या तुलनेत आज उध्दव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्या कायदेशीर हक्कावरून लढाईला सुरुवात झालेली दिसून येत आहे. शिंदे यांच्या बंडामुळे राज्यातील महाविकास आघाडीचे अल्पमतात आले आहे. त्यातच आज गुवाहटी येथे प्रसारमाध्यमाशी बोलताना एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट भूमिका मांडत एकप्रकारे मुख्यमंत्र्यांना आव्हान दिले आहे.
एकनाथ शिंदे म्हणाले की, आम्ही बाळासाहेबांच्या विचारांवर विश्वास ठेवणारे कार्यकर्ते आहोत असे सांगत आम्ही सर्व आमदार आता एकत्र आहोत. आम्ही बाळासाहेबांच्या विचारांवर विश्वास ठेवणारे कार्यकर्ते आहोत. आम्हा सर्वांची तीच भावना आहे. आमच्याकडे आवश्यकतेपेक्षा जास्त आमदारांचे संख्याबळ आहे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी राजीनामा द्यायचा की नाही याचा निर्णय त्यांनी घ्यायचा आहे. आम्ही पुढची दिशा ठरवण्यासाठी संध्याकाळी एक बैठक आयोजित केली आहे. ती बैठक झाल्यावर तुम्हाला त्याचा निर्णय कळवला जाईल असेही त्यांनी यावेळी सांगितले.
शिवसेना आमदाराला मारहाण झाल्याचा दावा केला जात असताना त्यांनी हा दावा फेटाळून लावला आहे. गुजरातमध्ये कोणत्याही आमदारांना मारहाण केली नाही. त्यांना परत पाठवताना कार्यकर्तेही त्यांच्या बरोबर दिले होते असे त्यांनी सांगितले.
दरम्यान एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे विधानसभा बरखास्तीच्या दिशेने जात असल्याचे संकेत शिवसेनेचे खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत यांनी दिले आहे. महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींचा प्रवास विधान सभा बरखास्तीच्या दिशेने, असं ट्वीट संजय राऊतांनी केले.
एकनाथ शिंदेंनी आपल्यासोबत ४० आमदार असून त्यापैकी ३३ आमदार हे शिवसेनेचे असल्याचं आज सकाळी सुरतमधून गुवहाटीमध्ये पोहोचल्यानंतर जाहीर केले. त्यानंतरपासूनच महाराष्ट्रातील सरकार अल्पमतात असल्याच्या चर्चा सुरु झाल्या होत्या. त्यानंतरच त्यांनी हे ट्वीट केलं होतं. त्यांच्या या ट्वीटनंतर अनेक राजकीय चर्चांना उधाण आले आहे. तर दुसरीकडे आज संध्याकाळी एकनाथ शिंदे नेमकी काय भूमिका घेणार? ते पक्ष सोडणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
मात्र आता एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनीच मुख्यमंत्री पदावर रहायचे की राजीनामा द्यायचा याचा निर्णय त्यांनीच घ्यावा असे सांगून मुख्यमंत्री ठाकरे यांना एकप्रकारे थेट आव्हानच दिले आहे.