मराठी ई-बातम्या टीम
मागील काही दिवसांपासून मुंबईसह राज्यात कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणावर वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर विधान भवनाने मोठा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार आता विधान भवनाचे कामकाज दोन शिफ्टमध्ये सुरु राहणार आहे. यासंदर्भातील आदेशही विधानभवन प्रशासनाकडून जारी करण्यात आला आहे.
राज्यातील सर्व विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या आमदारांचे सर्व प्रश्न विधानभवनाकडून सोडविले जातात. तसेच विधानभवनाच्या माध्यमातून दर सहा महिन्यांनी अधिवेशन बोलाविण्यात येते. त्याचबरोबर विधान भवनाच्या माध्यमातूनच राज्यातील सर्व आमदारांना येणाऱ्या अडचणी, त्यांचे वेतन व भत्ते, पेन्शन, यासह त्यांच्या गाडी खरेदीसाठीचे कर्ज उपलब्ध करून देणे यासह अनेक गोष्टी करण्यात येतात.
परंतु मुंबईत कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणावर वाढत असल्याने विधान भवनातील कर्मचारी एकाच वेळी कार्यालयात हजर राहील्याने कर्मचाऱ्यांची गर्दी होवून संसर्ग वाढण्याचा धोका वाढत आहे. त्यामुळे कार्यालयात येणाऱ्या कर्मचाऱ्यांना कोरोना संसर्गाची लागण होवू नये, तसेच कार्यालयात गर्दी होवू नये या उद्देशाने कार्यालयीन वेळेत बदल केला आहे. या वेळत करण्यात आलेल्या बदलानुसार सकाळी ९ ते दुपारी ३ आणि दुपारी १ ते संध्याकाळी ७ या दोन सत्रामध्ये कार्यालय सुरु ठेवण्याचा निर्णय विधान भवन प्रशासनाने घेतला आहे.
तसेच या दोन्ही सत्रात ५०-५० टक्के कर्मचाऱ्यांना कामासाठी बोलविण्यात येणार आहे. त्यासाठी उपसचिव आणि अवर सचिव यांनी यासंदर्भातील नियोजन करून दर आठवड्याच्या शुक्रवारी आस्थापना कक्षास कळवावी अशी सूचनाही सर्व अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत.
मुंबईसह राज्यातील कोरोनाला संसर्गाला रोखण्याच्यादृष्टीने १० जानेवारीपासून राज्यात नवे निर्बंध लागू करण्यात आले आहेत. या नव्या निर्बंधानुसार खाजगी आणि शासकिय कार्यालयातील गर्दीचे वातावरण टाळण्याच्या अनुषंगाने कर्मचाऱ्यांची संख्या ५०-५० टक्के ठेवणे, कार्यालय २ शिफ्टमध्ये कार्यरत राहील या पध्दतीने नियोजन करण्याच्या सूचना राज्य सरकारकडून आस्थापनांना जारी करण्यात आल्या आहेत. त्यानुसार अनेक कार्यालयाकडून तसे नियोजन करण्यात येत आहे. त्या नव्या निर्बंधानुसार हा निर्णय घेण्यात आल्याचे विधानभवनाकडून सांगण्यात येत आहे.
विधान भवनाने काढलेला आदेश पुढीलप्रमाणे-: