राज्यात शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पुणे, मुंबई आणि नागपूरातील प्रकल्पांचे उद्घाटन करण्याची चौथी वेळ आहे. या पार्श्वभूमीवर पहिल्यांदाच राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काही लोकांनी बेईमानी केली असल्याचा आरोप शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्यावर नाव न घेता करत त्यामुळेच राज्यात मागील अडीच वर्षात लोकांच्या मनातील सरकार स्थापन झाले नसल्याचा दावा केला.
मुंबईतील मेट्रो मार्गिका-२ आणि ७ च्या विस्तारीत प्रकल्पाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते वांद्रे-कुर्ला संकुलातील मैदानावर आज गुरूवाकरी झालेल्या कार्यक्रमात करण्यात आले. त्यावेळी झालेल्या जाहिर सभेत देवेंद्र फडणवीस हे बोलत होते. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्यासह भाजपा आणि शिंदे गटाचे खासदार, आमदार व मंत्री उपस्थित होते.
यावेळी फडणवीसांनी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचाही उल्लेख केला.
देवेंद्र फडणवीस म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी सगळीकडेच लोकप्रिय आहेत. मात्र, लोकप्रियतेची काही स्पर्धा झाली, तर मोदींच्या लोकप्रियतेत मुंबई पहिल्या क्रमांकावर असेल. इतकं मुंबईकरांचं मोदींवर प्रेम आहे. २०१९ मध्ये मोदींनी मुंबईतच म्हटलं होतं की, पाच वर्षांच्या डबल इंजिन सरकारने महाराष्ट्राला बदललं. तसेच पुन्हा एकदा डबल इंजिन सरकार आणण्याचं आवाहन केले.
मोदींच्या विश्वास ठेऊन महाराष्ट्राच्या जनतेने डबल इंजिन सरकार निवडून दिलं. मात्र, काही लोकांनी बेईमानी केली. त्यामुळे अडीच वर्षे जनतेच्या मनातील सरकार स्थापन झालं नाही. मात्र, बाळासाहेब ठाकरे यांचे खरे अनुयायी एकनाथ शिंदेंनी हिंमत केली आणि पंतप्रधान मोदींच्या आशीर्वादाने पुन्हा एकदा महाराष्ट्रात जनतेच्या मनातील सरकार स्थापन झालं, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.
देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले, आज अनेक उद्घाटनं होणार आहे, त्यात पंतप्रधान स्वनिधी कार्यक्रम अत्यंत महत्त्वाचा आहे. कोरोना काळात पंतप्रधान मोदींनी टपरीवाल्यापासून हातगाडीवाल्यापर्यंत सर्वांचा विचार करून त्यांच्यासाठी स्वनिधीची निर्मिती केली. मात्र, त्यावेळी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या अध्यक्षतेखाली एक बैठक झाली आणि त्यात गरिबांना पैसे देणारी योजना महाराष्ट्रात लागू न करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचा आरोप फडणवीसांनी केला.
अस असलं तरी आमचं पुन्हा सरकार आल्यावर आम्ही मुंबईतील एक लाख हातगाडी-टपरीधारकांना स्वनिधीचा लाभ देण्याचा निर्णय घेतला. आज हा आकडा एक लाख १५ हजारपर्यंत पोहचला आहे. मोदी एकमेव पंतप्रधान असतील ज्यांनी ज्या प्रकल्पांचं भूमिपूजन केलं त्याचं उद्घाटनही केलं, असा दावाही त्यांनी केला.
आज मेट्रोच्या ७ व २ लाईनच्या ३५ किलोमीटरचं उद्घाटन होत आहे. त्याचं भूमिपूजन मोदींनीच केलं होतं आणि आता उद्घाटनही तेच करत आहेत. ही नवी संस्कृती मोदींमुळे राज्यात आणि देशात निर्माण झाल्याचे ते म्हणाले.
Hon PM @NarendraModi dedicates to the Nation various Projects in Mumbai#MumbaiOnFastTrack #Mumbai #ThankYouModiJi #NarendraModi https://t.co/gOM1IGSYlI
— Devendra Fadnavis (Modi Ka Parivar) (@Dev_Fadnavis) January 19, 2023