एकाबाजूला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उभे करत शिवसेनेवर उभा दावा टाकला आहे. त्यामुळे शिवसेना नेमकी कोणाची यावरून ठाकरे गट आणि शिंदे गटात सध्या केंद्रीय निवडणूक आयोग आणि सर्वोच्च न्यायालयात संघर्ष सुरु आहे. या साऱ्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी वंचितचा समावेश महाविकास आघाडीत की फक्त ठाकरे गटाशी युती याबाबतचा निर्णय उध्दव ठाकरे यांनी घ्यायचा आहे असे सांगत काँग्रेस-राष्ट्रवादीशी बोलणार नसल्याचे स्पष्ट केले. त्यातच प्रकाश आंबेडकर यांचे काँग्रेस आणि राष्ट्रवादीशी फारसे चांगले संबध नाहीत. या पार्श्वभूमीवर वंचित आणि ठाकरे गटाच्या युतीबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांना विचारले असता त्यांनी मोठे विधान केले.
प्रसारमाध्यमांशी बोलताना प्रकाश आंबेडकर म्हणाले, उद्धव ठाकरेंबरोबर बोलणी सुरु आहे. अधिकृत घोषणा मी किंवा पक्षाच्या अध्यक्षा रेखाताई ठाकूर करतील. उद्धव ठाकरेंचं ठरलं की घोषणा होईल. राष्ट्रवादी आणि काँग्रेसला बरोबर घ्यावं असं शिवसेनेला वाटत आहे. दोन्ही पक्षांचं स्वागतचं करु. माझा दोन्ही पक्षांना विरोध नाही आहे, अशी भूमिकाही स्पष्ट केली.
शिवसेना आणि वंचित बहुजन आघाडीच्या युतीबद्दल प्रसारमाध्यांच्या प्रतिनिधींनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना विचारलं. तेव्हा शरद पवार म्हणाले की, “मला याबाबत काही माहिती नाही. मी या भानगडीत पडत नाही, असे सांगत या युतीबाबत अधिक बोलण्याचे टाळले.
दरम्यान, प्रकाश आंबेडकर म्हणाले की, काँग्रेस-राष्ट्रवादीने आम्हाला नाकारलं आहे. वंचित आघाडीने फक्त दलितांपुरतं मर्यादित राहावं. ओबीसी आणि गरीब मराठा यांच्यासंदर्भात आम्ही बोलू नये, ही काँग्रेस-राष्ट्रवादीची अट आहे. ती आम्ही मान्य करण्यास तयार नाही. तसेच, आम्हाला तिसरं इंजिन जोडणार आहे, असं एकनाथ शिंदे मुंबईतील भाषणात बोलले होते. हे तिसरं इंजिन राष्ट्रवादी आहे, की मनसे याचा खुलासा एकनाथ शिंदे करतील, अशी गुगलीही टाकली.