आमच्याइतके कडवट हिंदुत्ववादी देशात कुणी नसतील आम्ही ढोंगी नाही सांगतानाच त्र्यंबकेश्वर हा आमच्या आस्थेचा आणि श्रद्धेचा विषय असून तिथे कधीही अशा घटना घडल्याचं माझ्या स्मरणात नाही. परवाच्या घटनेत कुणीही मंदिरात घुसल्याची माझ्याकडे माहिती नाही. मंदिर प्रशासनावर दबाव आणून अशा प्रकारचं पत्र त्यांना द्यायला लावलं आणि त्यांनीच आज त्र्यंबकेश्वरला आंदोलन सुरू केलं आहे असा दावा खासदार संजय राऊत यांनी केला. हिंदुत्वाच्या नावावर टोळ्या निर्माण करून वातावरण बिघडविण्याचा कट केला जात असून दंगली घडवून राजकारण करायचं असेल, तर ते यशस्वी होणार नाही असेही राऊत म्हणाले
संजय राऊत पुढे बोलताना म्हणाले, महाराष्ट्रातला सामाजिक सलोखा योजनाबद्ध रीतीने बिघडवण्याचे खेळ सुरू आहेत. कारण आज जे सत्तेवर आहेत, ते अनैतिक मार्गानं सत्तेवर आले आहेत. लोकांचा त्यांना पाठिंबा नाही. नकली हिंदुत्वाच्या नावावर ते भजन करत आहेत. अशावेळी महाराष्ट्रात पुन्हा एकदा हिंदुत्वाच्या नावावर काही टोळ्या निर्माण करायच्या आणि संपूर्ण वातावरण बिघडवायचं असा कट दिसतोय, असा केला.
तसेच नाशिक येथील त्र्यंबकेश्वर प्रकरणी संजय राऊत म्हणाले, मुस्लिम समाजाचे सुफी संथ गुलाब शाह यांचा उरुस निघतो. गेल्या १०० वर्षांपासून ही परंपरा आहे. मंदिराच्या गेटवर ते आपल्या देवांना धूप दाखवून पुढे जातात. त्यानुसारच हा तो प्रकार झाला. देशात या परंपरा सर्वत्र आहेत. हे फक्त आपल्याकडे नाही अजमेर शरीफच्या दर्ग्यावर, माहिमच्या दर्ग्यावर, हाजीअलीच्या दर्ग्यावर मोठ्या प्रमाणावर हिंदू जात असतात त्यात संघाचेही लोक असतात. तिथे पोलिसांकडूनही चादर चढवली जाते. त्यामुळे हा श्रद्धेचा विषय असल्याचे मत व्यक्त केले.
राम नवमीला कधी नव्हे त्या दंगली झाल्या. त्यावर एसआयटी नेमली का तुम्ही?असा सवाल राऊत यांनी केला. या सरकारच्या पायाखालची जमीन हादरलेली आहे. त्याचा हा परिणाम आहे. तुम्हाला दंगली घडवून राजकारण करायचं असेल, तर ते यशस्वी होणार नाही. कर्नाटक निवडणुकीत प्रचाराच्या शेवटी चार दिवस नरेंद्र मोदींनी बजरंग बलीची गदा फिरवली. ती गदा त्यांच्याच डोक्यात पडली. मतदानाच्या दिवशी हनुमान चालीसाचं पठण तुम्ही करता आणि वातावरण बिघडवता. हे तुमचे धंदे आहेत. हा तुमचा व्यवसाय आहे. हिंदुत्व हा आमचा व्यवसाय नाही, आणि राजकीय रोजी रोटीही नाही. तर ती आमची श्रद्धा आहे असे राऊत म्हणाले.