सर्वोच्च न्यायालयाच्या निकालावरून सध्या राज्याच्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे. महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर न्यायालयाने मोठा निकाल दिला असून यात राज्यपालांनी घेतलेल्या निर्णयांवर ताशेरे ओढले. राज्यपालांनी घेतलेले निर्णय कायद्याला धरून नव्हते, असं स्पष्ट मत न्यायालयाने आपल्या निकालात नोंदवले. यासंदर्भात आता विरोधी पक्षांनी टीका करायला सुरुवात केली असतानाच दस्तुरखुद्द माजी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना विचारले असता त्यांनी जो गलत था गलत हो गया असे सांगत त्याचे आता काय असा सवाल केला.
सर्वोच्च न्यायालयाने राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या कार्यपध्दतीवर कडक शब्दात ताशेरे ओढले. त्यानंतर एका मराठी वृत्तवाहिनीच्या प्रतिनिधीने भगतसिंग कोश्यारी यांची प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी काहीशा चिडलेल्या भगतसिंग कोश्यारी रागात प्रतिक्रिया व्यक्त केली.
यावेळी बोलताना भगतसिंह कोश्यारी म्हणाले, बहुमत चाचणीचा निर्णय तेव्हा चुकीचा होता. आता त्याच्याशी काय करायचंय? यासंदर्भात न्यायालयानं सगळं सांगितलं आहे. न्यायालयाच्या निकालापुढे मला काहीही बोलायचं नाही. देशातील कोणताही नेता न्यायालयाच्या निकालावर बोलत नाही आणि बोलणार नाही असे सांगत ते आपल्या वाहनात जाऊन बसले.