आज मुंबईसह राज्यात दही हंडीचा उत्सव मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात येत आहे. मात्र या दही हंडीतील थर लावण्यावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आम्हीही हंडी फोडलीय. ती हंडी मोठी कठीण होती. पण ५० थर लावून ती हंडी फोडल्याचे वक्तव्य करत आपल्या बंडखोरीचे मोठेपणा सांगितला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या या वक्तव्याचा धागा पकडत शिवसेना भवनासमोरील निष्ठा हंडी उत्सवात सहभागी होण्यासाठी शिवसेना नेते आदित्य ठाकरे आले होते. त्यावेळी आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वक्तव्यावरून त्यांच्यावर पलटवार केला.
आदित्य ठाकरे म्हणाले की, ५० थर लावले की त्यांचा थरकाप झालाय हे सर्वांना माहित आहे. किमान आजच्या सणाच्या दिवशी तरी राजकारण नको. कुणी किती थर लावले यात मला पडायचं नाही. प्रत्येक ठिकाणी राजकारण नको असेही स्पष्ट केले.
ठाण्यातील टेंभी नाका येथे आनंद दिघे यांच्यापासून सुरु झालेल्या दही हंडी उत्सवाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी खासकरून हजेरी लावली. यावेळी उपस्थित गोविंदांना संबोधित बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले, राज्याच्या राजकारणात मागील दिड महिन्यापूर्वी आम्ही सर्वात मोठी हंडी लावली आणि ५० थर लावले. पण ती हंडी कठीण होती. मात्र ती फोडली.
याबाबत आदित्य ठाकरे यांना विचारण्यात आले असता ते म्हणाले, कुणी किती थर लावले यात मला पडायचं नाही. ५० थर लावले की थरकाप उडालाय हे सगळ्यांना माहित आहे. किमान आजच्या दिवशी तरी सणात राजकारण नको. कारण प्रत्येक ठिकाणी राजकारण आणण्याची गरज नसते. २४ तास राजकारणकरत राहिलं तर सणांचं महत्व तरी काय ? त्यामुळे मला त्यात पडायचं नाही.
त्याचबरोबर शिवसेनेची सत्ता असताना प्रत्येक सणावर बंदी घालण्यात आली होती. त्यामुळे शिवसेना हिंदूत्व विरोधी अशी टीकाही करण्यात आलीय याबाबत विचारले असता आदित्य ठाकरे यांनी मोजक्या शब्दात प्रत्युत्तर दिले. या टीकेवर बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले की, आजचा दिवस सणाचा आहे. मला प्रत्येक गोष्टीत राजकारण आणण्याची गरज वाटत नाही. ठिक आहे आम्ही हिंदूत्वविरोधी असू तुमचं धर्मावर जास्त प्रेम असेल तर तुम्ही सणात राजकारण आणणार नाही अशी आमची अपेक्षा आहे. राजकारण राजकारणाच्या ठिकाणी राहु द्यात. आज जो सण आहे तो सणासारखा साजरा होवू द्या असे मतही व्यक्त केले.