सत्तांतरानंतर जवळपास ४० दिवस रखडलेल्या शिंदे-फडणवीस सरकारच्या राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार आज राजभवनातील दरबार हॉलमध्ये पार पडला. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी १८ जणांना पद व गोपनियतेची शपथ दिली. मंत्रिमंडळ विस्तारात भाजपाच्या मंत्र्यांनी सर्वात आधी शपथ घेतली. त्यानंतर शिंदे गटाच्या मंत्र्यांनी शपथ घेतली. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपातील अनेक नेते उपस्थित होते.
या समारंभास विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड, केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री कपिल पाटील, विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवार, राज्याचे मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव, प्रधान सचिव तथा मुख्य राजशिष्टाचार अधिकारी मनिषा म्हैसकर उपस्थित होते.
राष्ट्रगीताने शपथविधी सोहळ्याची सुरुवात आणि सांगता झाली. या सोहळ्याला नवनियुक्त मंत्र्यांचे कुटुंबीय, लोकप्रतिनिधी, वरिष्ठ अधिकारी आदी उपस्थित होते.
भाजपाकडून मंत्री पदावर देवेंद्र फडणवीस यांचे जवळचे म्हणून ओळखले जाणारे राधाकृष्ण विखे-पाटील, सुधीर मुनगंटीवार, चंद्रकांत पाटील, डॉ.विजय कुमार गावीत, गिरीष महाजन, रविंद्र चव्हाण, अतुल सावे, मंगलप्रभात लोढा, सुरेश खाडे यांनी मंत्री पदाची शपथ घेतली.
तर शिंदे गटातून गुलाबराव पाटील, दादाजी भुसे, संदीपान भुमरे, संजय राठोड, उदय सामंत, प्रा.तानाजी सावंत, अब्दुल सत्तार. दिपक केसरकर, शंभूराज देसाई आदींनी शपथ घेतली.
या सर्वांना कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ देण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र या पहिल्या मंत्रिमंडळ विस्तारात एकनाथ शिंदे यांच्याबरोबर बच्चू कडू, राजेंद्र यड्रावकर, यासह अन्य अपक्षांनीही शिवसेनेच्या विरोधातील बंडात सहभाग नोंदविला होता. मात्र यापैकी कोणालाही आजच्या पहिल्या मंत्रिमंडळ विस्तारात स्थान देण्यात आले नाही. त्यामुळे अपक्षांमध्ये नाराजी निर्माण झाल्याची चर्चा राजकिय वर्तुळात सुरु झाली आहे.
दरम्यान शिंदे गटातील काही आमदारांना मंत्री पदाची अपेक्षा होती. परंतु त्यांना मंत्रीपदाने हुलकावणी दिल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे संजय शिरसाट, शहाजी बापू पाटील यांच्यासह अन्य काही जणांचा समावेश आहे.