महाविकास आघाडी सरकारच्या शेवटच्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत तत्कालीन मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी औरंगाबाद शहराचं नामकरण ‘संभाजीनगर’ केले. त्यानंतर सत्तांतर होत राज्यात स्थानापन्न झालेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारनेही हा निर्णय कायम ठेवला. मात्र या नामांतरावरून मागील काही दिवसांपासून राज्यातील राजकारण तापलेल असतानाच समाजवादी पार्टीचे नेते अबू आझमी यांचं नुकतचं एक वादग्रस्त विधान समोर आलं. या विधानावर प्रतिक्रिया व्यक्त करताना माजी खासदार संभाजी राजे म्हणाले, अबू आझमी महाराष्ट्रात का राहतोय, असल्या माणसाला पहिलं महाराष्ट्राच्या बाहेर फेकलं पाहिजे, असं बोलायची याची हिंमत कशी काय होते? असा संतप्त सवालही केला.
लोणावळ्यात आले असता संभाजी राजे यांना यासंदर्भात प्रतिक्रिया व्यक्त केली.
अबू आझमी म्हणाले होते की, औरंगजेब हा वाईट राजा नव्हता. औरंगजेबचा खरा इतिहास लोकांसमोर आणला तर कोणताही हिंदू व्यक्ती नाराज होणार नाही असे वक्तव्य केले. यावरून विविध प्रतिक्रिया उमटत आहेत.
संभाजी राजे म्हणाले, अबू आझमी महाराष्ट्रात का राहतोय, असल्या माणसाला पहिलं महाराष्ट्राच्या बाहेर फेकलं पाहिजे, असं बोलायची याची हिंमत कशी काय होते? शिवाजी महाराजांनी मुघलशाहीला केवळ महाराष्ट्रातूनच नाही तर संपूर्ण देशातून बाहेर काढण्याच ठरवलं होतं आणि हे अशी माणसं महाराष्ट्रात राहतात हे दुर्दैव आहे. महाराष्ष्ट्रातील नागरिकांनी त्यांना(अबू आझमीला) सांगायला हवं की तुला जर महाराष्ट्रात राहायचं असेल तर छत्रपती शिवाजी महाराजांचं, शाहू, फुले आंबेडकरांचं आणि सगळ्या संतांचं नाव घ्यायला पाहिजे, काय त्या औरंगजेबच नाव घेतोय असेही ते म्हणाले.
सात वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार करून हत्या करणाऱ्या त्या आरोपीला कठोर शिक्षा झाली पाहिजे. महाराष्ट्राचे हे संस्कार नाहीत. कायदा आणखी कडक करण्यासाठी संसदेमध्ये खासदारांनी आवाज उठवायला हवा, जेणेकरून असं धाडस कोणी करणार नाही. यासाठी प्रामुख्याने महाराष्ट्रातील खासदारांनी आवाज उठवणं गरजेचं असल्याचे मतही त्यांनी भंडाऱ्यातील महिलेवरील अत्याचाराच्या घटनेवर प्रतिक्रिया व्यक्त केली. राज्यातील मंत्रिमंडळ विस्ताराविषयी विचारले असता संभाजी राजे म्हणाले की, लवकरात लवकर मंत्रीमंडळ स्थापन करा आणि राज्यातील जनतेचे प्रश्न मार्गी लावा, असेही ते म्हणाले.
दरम्यान, औरंगाबादमध्ये अनेक लोकांचं नाव औरंगजेब असून रावसाहेब दानवे यांचा दावा खोटा असल्याचंही अबू आझमी यांनी म्हटलं आहे. माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी सांगितलं की, औरंगजेब हा वाईट राजा नव्हता. औरंगजेबचा खरा इतिहास लोकांसमोर आणला तर कोणतीही हिंदू व्यक्ती नाराज होणार नाही. सध्या चुकीच्या पद्धतीने त्यांचा इतिहास दाखवला जात आहे. त्यामुळे तुम्ही राम पुनियानी यांना भेटा, ते मुस्लीम नाहीत. पण त्यांना औरंगजेबबाबत विचारा, औरंगजेब चांगला मुसलमान होता, याची हजारो उदाहरणं त्यांच्याकडे आहेत असेही ते म्हणाले.
महाराष्ट्रात औरंगाबाद, अहमदनगर आणि उस्मानाबाद या तीन शहरांच्या नावात मुस्लीम नाव आहे. ही तीन नावं बदलल्याने जर महाराष्ट्रातील जनतेला नोकरी मिळणार असेल, येथील शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबणार असतील, विकास होणार असेल तर मी नामकरणाचं स्वागत करेन अशी उपरोधिक टीकाही त्यांनी यावेळी केली.