राज्यसभा निवडणूकीतील मतदान करण्याच्या पध्दतीवरून भाजपा आणि महाविकास आघाडीने एकमेकांवर आक्षेप घेत त्याप्रश्नी केंद्रीय निवडणूक आयोगाकडे दाद मागितली. त्यानुसार शिवसेनेचे सुहास कांदे यांचे बाद ठरवित बाकीच्या आक्षेपांमध्ये तथ्य नसल्याचे मत सांगत आयोगाने निकाल दिला.
त्यानंतर झालेल्या मतमोजणीत महाविकास आघाडीकडे पुरेसे संख्याबळ असतानाही त्यांच्या संख्याबळाने दगा दिला. त्यामुळे महाविकास आघाडीच्या चवथ्या उमेदवाराला अर्थात संजय पवार यांना पराभवाला सामोरे जावे लागले. तर पुरेसे संख्याबळ नसताना मात्र भाजपाच्या तिसऱ्या उमेदवाराच्या गळ्यात विजयाची माळ पडली.
त्यामुळे संख्याबळ असूनही महाविकास आघाडीचा पराभव झाला तर पुरेशी मॅजिक फिगर नसताना भाजपाने विजयश्री खेचून आणल्याचा निकाल पहाटे जाहिर होताच स्पष्ट झाले.
राज्यसभेच्या मतदानावेळी भाजपाने महाविकास आघाडी सरकारमधील तीन जणांच्या मतदानावर आक्षेप घेतला तर महाविकास आघाडीने भाजपाच्या दोन मतांवर आक्षेप घेतला. आणि या दोघांनीही एकमेकांची मते बाद करण्याची मागणी केंद्रीय निवडणूक आयोगाकडे रात्रीच केली.
त्यानंतर जवळपास साडे नऊ तासांनी निवडणूक आयोगाने आपला निर्णय देत मतमोजणीला मध्यरात्रीनंतर १ च्या सुमारास मतमोजणीस परवानगी दिली. या मतमोजणीत भाजपाच्या पियुष गोयल, डॉ.अनिल बोंडे यांना प्रत्येकी ४८ मते, तर तिसरा उमेदवार असलेले धनंजय महाडीक यांना ४१ मते मिळून विजयी झाले.
तर काँग्रेसच्या इम्रान प्रतापगढी यांना ४४, राष्ट्रवादीच्या प्रफुल पटेल यांना ४३, शिवसेनेच्या संजय राऊत यांनी ४१ मते मिळवित विजय संपादन केला. तर शिवसेनेचे चवथे उमेदवार संजय पवार यांचा महाडीक यांना मिळालेल्या मतांच्या तुलनेत २ मते ३८ इतकी मिळाल्याने पराभवाला सामोरे जावे लागले.
वास्तविक पाहता महाविकास आघाडीकडे १६७ मते हाताशी होते. तर भाजपाकडे ११३ मतेच होती. त्यामुळे मतदानाच्या शेवटच्या क्षणापर्यत महाविकास आघाडीचा चवथा उमेदवार संजय पवार हे जिंकणारच असले सर्वत्र बोलले जात होते. तसेच त्याचा दावाही महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून करण्यात येत होता.
मात्र मतदानावरील आक्षेपामुळे कारण नसताना साडे नऊ तास वाया गेले आणि त्यानंतर केंद्रीय निवडणूक आयोगाने सुहास कांदे यांचे मत बाद ठरवित मतमोजणीस परवानगी दिली. मतमोजणी झाल्यानंतर मात्र निवडणूकीचा भलताच निकाल जाहिर झाला. या निवडणूकीत महाविकास आघाडीच्याच संख्याबळातील मते फुटल्याचे चित्र या निमित्ताने पुढे आले.
यामुळे महाविकास आघाडीत सांगण्यात येत असलेला ऑल इज वेल प्रत्यक्षात नसल्याचे स्पष्ट झाले. विशेष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसने, काँग्रेसने आपापल्या उमेदवारांच्या विजयाचा निश्चित करून त्याचा कोटाही निश्चित केला. मात्र शिवसेनेला त्यांच्या चवथ्या उमेदवाराच्या विजयासाठी निश्चित कोटा आणि कोट्यातील मते पुरविण्यास मदत केली नसल्याचे स्पष्ट दिसत आहे. त्यामुळे महाविकास आघाडीत सारेच आलबेल नसल्याचे या निमित्ताने अधोरेखित झाले आहे.