शिवसेनेतील फुटीनंतर सुषमा अंधारे यांनी शिवसेनेत प्रवेश केला. त्यानंतर महाप्रबोधन यात्रेच्या निमित्ताने त्या सध्या महाराष्ट्र पिंजून काढत आहेत. विशेषत: शिंदे गटाचे आमदार आहेत त्यांच्या बालेकिल्ल्यात त्या आवर्जून सभा घेत आहेत. तसेच त्यांच्या सभांना चांगला प्रतिसादही मिळत आहे. दरम्यान, सध्या भंडाऱ्याच्या दौऱ्यावर असलेल्या सुषमा अंधारे यांनी भाजपाचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि स्व.गोपीनाथ मुंडे यांचे नाव घेत मोठे विधान केले. भंडारा येथील जाहिर सभेत बोलताना सुषमा अंधारे म्हणाल्या की, नितीन गडकरी गोपीनाथ मुंडे यांना ट्रॅपमध्ये अडकवायचे असे खळबळजनक वक्तव्य केले.
एक काळ होता जेव्हा नागपूर आणि बीड यांच्यात संघर्ष चालायचा. इकडे नितीन गडकरी आणि तिकडे गोपीनाथ मुंडे अशी स्थिती होती. नितीन गडकरी बहुजनांचे नेते गोपीनाथ मुंडे यांना जाणीवपूर्वक ट्रॅपमध्ये अडकवायचे. गोपीनाथ मुंडे यांना जाणीवपूर्वक परेशान, हैराण करायचे. त्यानंतर दुसऱ्या पिढीलाही तेच सुरू झाले. देवेंद्र फडणवीस लोकनेत्या पंकजा मुंडे यांच्या मागे लागले आहेत. पंकजा मुंडे यांना हैराण करण्यास सुरूवात करण्यात असल्याचे विधानही त्यांनी यावेळी केले.
मी बीडमधील आहे, तर त्यांना वाटतं ते मला हैराण करू शकतील. मात्र ते सध्या भ्रमात आहेत. तुम्ही माझ्यामागे ईडी लावू शकत नाहीत. उभ्या महाराष्ट्रात माझ्या नावावर कुठेही एक एकर जमीन नाही. माझ्या नावावर कुठेही एक एकर जमीन असेल तर मी यानंतर महाप्रबोधन यात्रेच्या स्टेजवर दिसणार नाही. मी कष्टाची भाकरी खाते. माझी आई कोरडवाहू जमिनीत राबते. माझ्या कुटुंबियांना राजकारणाबाबत काहीही माहिती नाही, असेही त्या म्हणाल्या.
उद्धव ठाकरे जेव्हा पायऱ्यांवरून उतरत होते. ते बघून माझी आई रडत होती. एवढ्या चांगल्या देवमाणसाला या लोकांनी त्रास दिला, असे माझी आई म्हणत होती. तेव्हाच मी उद्धव ठाकरे यांना साथ दिली पाहिजे, असे माझ्या मनात आले. आता आपण लढायचे ठरवले आहे, असे सांगत उद्धव ठाकरे गटातील कार्यकत्यांना प्रोत्साहित करण्याचा प्रयत्न त्यांनी केला.