खाते वाटप झाल्याबरोबर सांस्कृतिक कार्यमंत्री झालेल्या सुधीर मुनगंटीवार यांनी सर्व सरकारी कर्मचाऱ्यांनी आता फोनवर बोलताना हॅलोऐवजी वंदे मातरम म्हणावे असा आदेश जारी केला. यावरून राजकिय पटलावर त्याचे पडसाद उमटत असताना काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मुनगंटीवार यांच्या या घोषणेला प्रत्युत्तर देत फोनवरून आता जय बळीराजा म्हणा असे जाहिर केले.
यावेळी बोलताना नाना पटोले म्हणाले, आपला देश कृषीप्रधान आहे, देशाच्या अर्थव्यवस्थेत कृषी क्षेत्राचा वाटा महत्वाचा आहे पण शेती व शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे सरकार दुर्लक्ष करत आहे. जीडीपी घरसत असताना तो सावरण्याएवेजी डीपी बदलण्याचे आवाहन केले जात आहे. जगाच्या पोशिंद्याकडे दुर्लक्ष होता कामा नये यासाठी तसेच बळीराजाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी बोलताना सर्वांनी ‘जय बळीराजा’ म्हणा, असे आवाहन केले.
वंदे मातरम् बद्दल आम्हाला आक्षेप असण्याचे कारण नाही, आम्हाला त्याचा अभिमानच आहे, पण त्यासाठी कोणावर जबरदस्ती करता येणार नाही. शेतकरी आपल्या देशाच्या कणा आहे त्याच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. महत्वाचे विषय दुसरीकडे वळवण्यासाठी धर्माच्या आधारावर काही मुद्दे पुढे केले जात असतील तर ते बरोबर नाही. आपल्या देशाचा अन्नदाता असुरक्षित व दुर्लक्षित आहे, जीडीपी शेतीवरच आधारीत आहे जीड़ीपी ऐवजी डीपी बदल्यास सांगितले जाते म्हणूनच आम्ही बोलताना सर्वांनी बळीराजाची आठवण रहावी म्हणून जय बळीराजा बोलावे अशी भूमिका घेतली असल्याचे ते म्हणाले.
शेतकऱ्यांचे प्रश्न महत्वाचे आहेत, अतिवृष्टीने राज्यातील अनेक भागातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झालेले आहे पण अजून पंचनामे झालेले नाहीत. राज्य सरकारने जाहीर केलेली मदत तुटपुंजी आहे, हेक्टरी ७५ हजार रुपये द्यावेत ही आमची मागणी आहे. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी शेतकऱ्यांचा प्रश्न लावून धरू व शेतकऱ्याला भरीव तसेच तातडीने मदत देण्यास राज्य सरकारला भाग पाडू. काँग्रेसच्या नेत्यांनी शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन त्यांना धीर देण्याचा प्रयत्न केला पण राज्यातील सरकार हे मात्र शेतकरी विरोधी आहे.
स्वातंत्र्यदिनी पंतप्रधानांनी लाल किल्यावरून देशाला संबोधीत केले पण महागाई, बेरोजगारी, शेतकरी, कामगार, देशातील ज्वलंत प्रश्न यावर ते एक शब्दही बोलले नाहीत. पंतप्रधान महागाईमधील ‘म’ सुद्धा बोलले नाहीत. पंतप्रधान दीड तास तेच तेच बोलत होते पण सर्वसामान्य माणसाच्या प्रश्नांची दखलही घेतली नाही हे दुर्दैवी आहे अशी टीकाही त्यांनी यावेळी केली.