Breaking News

नाना पटोले यांचा इशारा; सूडबुद्धीची कारवाई सहन करणार नाही राहुल गांधींवरील ईडी चौकशीविरोधात राजभवनवर धडक मोर्चा

केंद्रातील भाजपा सरकार काँग्रेस नेतृत्वाला सरकारी यंत्रणांच्या माध्यमातून घाबरवण्याचा प्रयत्न करत आहे. परंतु अशा दबावाला अथवा दहशतीला आम्ही भीक घालत नाही. देशातील जनतेचे प्रश्न हाती घेत मोदी सरकारला सातत्याने कोंडीत पकडणारे राहुल गांधी हे देशाचा आवाज बनले आहेत. त्यांच्यावरील सूडबुद्धीच्या कारवाईमुळे काँग्रेसचा कार्यकर्ता पेटून उठला आहे. ही कारवाई आम्ही सहन करणार नाही, केंद्र सरकारविरोधात आमचा संघर्ष सुरुच राहिल असा इशारा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिला.

केंद्र सरकारने राहुल गांधींविरोधात सुरु केलेल्या ईडी चौकशीविरोधात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या नेतृत्वाखाली राजभवनवर धडक मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात विधिमंडळ पक्षनेते व महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, उर्जामंत्री डॉ. नितीन राऊत, मत्स्यसंवर्धन मंत्री अस्लम शेख, महिला व बालकल्यणा मंत्री यशोमती ठाकूर, शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड, वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख, कृषी राज्यमंत्री विश्वजित कदम, मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप, आ. अमर राजूरकर, प्रदेश कार्याध्यक्ष शिवाजीराव मोघे, चंद्रकांत हंडोरे, नसीम खान, बसवराज पाटील, उपाध्यक्ष मोहन जोशी, प्रदेश काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे, प्रवक्ते अरुण सावंत, सुरेशचंद्र राजहंस, निजामुद्दीन राईन, सरचिटणीस देवानंद पवार, प्रमोद मोरे, सरचिटणीस ब्रिजकिशोर दत्त, अभिजित सपकाळ, मुंबई काँग्रेसचे कार्याध्यक्ष चरणजितसिंह सप्रा, मुंबई युवक काँग्रेसचे अध्यक्ष आ. झिशान सिद्दीकी, राजेश शर्मा, राजाराम देशमुख, झिशान अहमद यांच्यासह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.
प्रसार माध्यमांशी बोलताना प्रदेशाध्यक्ष पुढे म्हणाले की, राजकीय द्वेषातून भाजपा सरकार करत असलेल्या कारवाई विरोधात काँग्रेस रस्त्यावर उतलेली असताना पोलीस बळाचा वापर करून मंत्री, खासदार आमदार, महिला कार्यकर्ते यांना मारहाण केली जात आहे. देशात आज अराजकता निर्माण केली आहे. याविरोधातील असंतोष व्यक्त केला जात आहे. केंद्रातील बहिऱ्या व मुक्या सरकारला अंसतोषाचा हा आवाज पोहचवण्यासठी राजभवनवर धडक मोर्चा काढला असून केंद्र सरकारच्या विरोधातील आमचा हा संघर्ष सुरुच राहिल.
यावेळी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले की, सोनिया व राहुल गांधी यांना नोटीसा पाठवून नाहक त्रास दिला जात आहे. तीन दिवस राहुल गांधी यांची चौकशीच्या नावाखाली छळ केला जात आहे. काँग्रेसचा कार्यकर्ता केंद्र सरकारची हा दडपशाही सहन करणारा नाही त्याविरोधात उभा राहिला आहे. या मोर्चाच्या माध्यमातून हा असंतोष मोदी सरकारपर्यंत पोहचवण्याचा आमचा प्रयत्न आहे. ज्या कुटुंबाने देशासाठी सर्वस्व त्याग केला, बलिदान केले त्या कुटुंबाला अशा प्रकरणे त्रास देणे निंदनीय आहे. मोदी सरकारच्या या दडपशाहीला सोनिया व राहुल गांधी पुरून उरतील. आमचे हे नेते मोदी सरकारच्या समोर कदापी झुकणारे नाहीत. आमच्या भावना राज्यपालांनी केंद्र सरकारला कळवाव्यात हीच आमची अपेक्षा आहे.
सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण म्हणाले की, खोट्या प्रकरणात अडकवून आमच्या नेतृत्वाला दाबण्याचा केला जात आहे. परंतु आम्ही ते सहन करणार नाही. आम्ही आमच्या तीव्र भावना या मोर्चाच्या माध्यमातून व्यक्त केल्या आहे. राज्यपाल महोदयांनी आमच्या या भावना केंद्र सरकारपर्यंत पोहचवाव्या.
हँगिक गार्डनपासून निघालेला मोर्चा पोलिसांनी राजभवन जवळ अडवला व नंतर पोलिसांनी सर्वांना ताब्यात घेऊन आझाद मैदान पोलीस स्टेशनला घेऊन गेले.

Check Also

काँग्रेसचे माजी आमदार मुश्ताक अंतुले यांचा अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश

मुश्ताक अंतुले यांच्यासह अनेक लोकं आपल्यासोबत येत आहेत याचा अर्थ अजित पवार यांनी घेतलेला महत्वपूर्ण …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *