काँग्रेसचा लोकसभा आणि अनेक राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत धक्कादायक पराभव झाला. त्यातच मागील काही दिवसांपासून सातत्याने काँग्रेसमधील वरिष्ठ नेत्यांचा आणि राहुल गांधी यांच्यात एकप्रकारचा छुपा संघर्ष सुरु आहे. त्यामुळे काँग्रेस दुभंगल्याचे चित्र निर्माण झाले आहे. त्यातच काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कपिल सिब्बल, गुलाम नबी आझाद यांनी काँग्रेसमधून बाहेर जाणे स्विकारल्यामुळे काँग्रेसमधील अंतर्गत कलह चांगलाच वाढला असल्याचे दिसून येत आहे. यापार्श्वभूमीवर काँग्रेसने राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली भारत जोडो अभियान सुरु केले असतानाच काँग्रेस पक्षाध्यक्ष निवडणूक प्रक्रियेची घोषणाही करण्यात आलेली आहे. यापार्श्वभूमीवर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पक्षाच्या अध्यक्ष पदाची निवडणूक लढविणार की नाही याबाबत आज भाष्य केले.
सद्यपरिस्थितीत काँग्रेसची भारत जोडो यात्राही तामीळनाडूत पोहोचली असून तेथे चांगला प्रतिसाद मिळताना दिसत आहे. या यात्रेत अनेक कार्यकर्त्ये सहभागी होत असताना स्थानिक नागरीकांकडूनही या यात्रेचे स्वागत होताना दिसून येत आहे.
भारत जोडो यात्रे’च्या तिसऱ्या दिवशी राहुल गांधी यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलताना राहुल गांधी म्हणाले, मी काँग्रेसचा अध्यक्ष होणार की नाही, हे निवडणुका झाल्यावर स्पष्ट होईल. मला काय करायचं आहे, ते मी ठरवलं आहे. त्याबाबत कोणताही गोंधळ नाही असे स्पष्ट करत आपण अध्यक्ष पदाच्या निवडणूकीपासून लांब नसल्याचे सांगितले.
काँग्रेसला वाचवण्यासाठी ‘भारत जोडो यात्रे’चं आयोजन करण्यात आलं आहे, अशी टीका भाजपाने केली आहे. त्यावर राहुल गांधीनी जोरदार पलटवार केला आहे. भाजपा आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला आपले विचार मांडायला स्वातंत्र आहे. आम्ही लोकांसोबत जोडण्यासाठी ही यात्रा करत आहोत. भारत जोडो यात्रेच्या माध्यमातून जमिनीवर काय परिस्थिती आहे, याची माहिती घेत आहोत. त्यासोबत भाजपा, स्वयंसेवक संघाने केलेल्या नुकसानाची भरपाई करण्याचं काम करतं आहोत असा पलटवारही त्यांनी भाजपा आणि राष्ट्रीय स्वंयसेवक संघावर केला.