मातोश्रीसमोर आम्ही हनुमान चालिसा म्हणणार असल्याचे आव्हान शिवसेनेला देत मुंबईत आलेल्या राणा दांम्पत्याला अखेर शिवसेनेच्या आक्रमक पवित्र्यामुळे आपले आंदोलन स्थगित करत असल्याची घोषणा करावी लागली. यापार्श्वभूमीवर शिवसेना प्रवक्ते संजय राऊत यांनी राणा दांम्पत्यावर चांगलीच टीका केली असून शिवसेनेच्या नादाल लागाल तर आधी गौऱ्या रचून या असा गर्भित इशारा देत २० फुट खोल खड्याही जाल असाही इशाराही दिला.
अमरावतीचे बंटी-बबली मुंबईत आले होते असे म्हणत ते म्हणाले की, बोगस घंटाधारी हिंदुत्ववादी वातावरण गढूळ करत असून, राणा दाम्पत्याने मुंबईत येऊन गोंधळ घालण्याचा प्रयत्न केले. शिवसेनेचं हिंदुत्व अशा घंटाधारीचं नाही. आमचं हिंदुत्व घंटाधारी नाही तर, गदाधारी असल्याचे सांगत शिवसेनेला हिंदुत्व शिकवण्याचा अतिशहाणपणा कुणी करू नका, मातोश्रीच्या वाटेला जाऊ नका नाहीतर २० फुट खाली गाडले जाल असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.
राणांच्या खांद्यावर बंदूक ठेवून शिवसेनेवर हल्ला करण्याचा प्रयत्न असल्याचे म्हणत ते म्हणाले की, परत जर शिवसेनेच्या अंगावर याल तर, येतांना स्मशानात गोवऱ्या रचून यावे, असा इशाराही राऊत यांनी दिला. पंतप्रधानांच्या रक्षणासाठी सेना उभी राहणार आहे. राणा दाम्पत्याच्या पाठीशी भाजपा असल्याचाही आरोप करत गरज पडल्यानंतर शिवसेनेने हातात हातोडेदेखील घेतले आहेत. त्यामुळे कुणी आम्हाला हिंदुत्व शिकवण्याचा शहाणपणा करू नये अशी टीकाही त्यांनी केली.
मोदींच्या दौऱ्याला गालबोट लागू नये, असं ते म्हणतात. पण या दौऱ्याला जे गालबोट लाऊ इच्छितात त्यांचा समाचार घ्यायला शिवसेना पुढे असेल. ज्या हजारोंच्या संख्येने शिवसैनिक रस्त्यावर उतरले आहे, मला त्यांचं कौतुक वाटतंय. शिवसैनिकांनी त्यांच्यासाठी काही रुग्णवाहिका ठेवल्या होत्या असं म्हणत शिवसैनिकांचा मानवतावादी दृष्टीकोन पाहा असे यावेळी राऊत यांनी स्पष्ट केले. हे भंपक बोगस लोक हिंदूत्वाच्या नावाखाली शिवसेनेवर हल्ला कऱण्याचा प्रय़त्न करत असल्याचा आरोप अखेर त्यांनी केला.