मागील काही दिवसांपासून राज्यात मस्जिदीवरील भोंग्यावरून मनसे, भाजपाने राज्यातील महाविकास आघाडीवर निशाणा साधत असतानाच आज शिवसेनेचे प्रवक्ते तथा खासदार संजय राऊत यांनी मनसेवर टीकेची झोड उठवित भाजपाला महागाईच्या मुद्यावरून बोलण्याचे आव्हान दिले.
महाराष्ट्रात पोलिसांच्या भीतीने सर्व राजकीय भोंगे गायब झाले, असे सांगत त्यांनी हिंदू समाजातच फूट पाडण्याचा प्रयत्न केला. खरंतर त्यांना हिंदू समाजातच फूट पाडून दंगली घडवायच्या आहेत, असा गंभीर आरोपही त्यांनी केला. शनिवारी सकाळी मुंबईत पत्रकारांशी बोलत होते.
पोलिसांच्या भीतीने सर्व राजकीय भोंगे गायब झाले. इथं कायद्याचं राज्य आहे. या राज्यात सर्वोच्च न्यायालयाचे जे निर्देश आहेत, त्यानुसार काम होईल. महाराष्ट्रात शांतता आहे. कोणत्याही समाजात कुठंही भांडण नाही, सर्व ठीक आहे. काही लोक वातावरण खराब करण्याचा प्रयत्न करत होते. भोंग्यावरून हिंदू मुस्लीम यांच्यात तणाव निर्माण करण्याचा, दंगे करण्याचे प्रयत्न करण्यात आले. मात्र, महाराष्ट्रातील सर्व जाती, धर्माच्या लोकांनी त्यांना खणखणीत उत्तर दिलं. ना हे महाराष्ट्रात चालेल, ना देशात असा इशाराही त्यांनी यावेळी मनसे आणि भाजपाला दिला.
भोंग्यांबाबत देशात नक्कीच एक धोरण असायला हवं असं आम्ही आधीही म्हटलं आहे. मला वाटतं आता सरकारला हे धोरण करावं लागेल. गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी देखील याबाबत राष्ट्रीय धोरण जाहीर करण्याची मागणी केली. याप्रमाणे देशासाठी धोरण करून देशाला लागू करा. यात जात-धर्माचा प्रश्न येत नाही. मात्र, ज्यांनी मशिदीवरील भोंग्याचा विषय काढला त्याचा सर्वात मोठा फटका महाराष्ट्रात हिंदू मंदिरांना बसला असल्याचे सांगत याचा फटका भजन, कीर्तन करणाऱ्या मंडळांना बसला. त्यामुळे महाराष्ट्रात या भूमिकेवर सर्वात जास्त नाराज हिंदू समाज आहे. खरंतर यांना हिंदू समाजातच फूट पाडून आपआपसात दंगली घडवायच्या आहेत. सुदैवाने महाराष्ट्रात असं काही होऊ शकलं नाही. या राज्याची जनता सुजाण असल्याचा टोलाही त्यांनी मनसेला लगावला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सध्या युरोप दौऱ्यावर असून त्यावरून राऊत यांनी मोदी आणि भाजपावर निशाणा साधत म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना रशिया आणि युक्रेनमधील युद्धाची चिंता आहे. त्यासाठी ते मध्यस्थी करत आहेत. त्यासाठी त्यांचे भक्त त्यांची वाहवाह करत आहेत. मात्र, या देशातील जनता महागाईशी युद्ध करत आहे. पेट्रोल, डिझेल, सिलेंडर दर, बेरोजगारी या संदर्भात भाजपाचा एकही नेता, मंत्री बोलत नाही. भोंग्यावर कसले बोलताय, महागाई, बेरोजगारीवर बोला असे आव्हान देत सरकार म्हणून अन्न, वस्त्र, निवारा, महागाई यावर बोलणं सरकारचं कर्तव्य असल्याची आठवणही त्यांनी यावेळी करून दिली.
Tags bjp inflation mns raj thackeray shivsena spokesperson sanjay raut
Check Also
जयराम रमेश यांचे भाकित, मतदानाचे संकेत स्पष्ट, मोदी सरकारला निरोप…
लोकसभेच्या पहिल्या टप्प्यातील १०२ जागांवर झालेले मतदान हे भाजपा व नरेंद्र मोदी सरकारचे शेवटचे दिवस …