शिवसेनेतील दुसऱ्या क्रमांकाचे नेते एकनाथ शिंदे यांनी पुकारलेल्या बंडाला ३७ आमदारांसह काही अपक्ष आमदारांनी पाठींबा देत शिंदे गटात सहभागी झाले. सद्यपरिस्थितीत एकनाथ शिंदे यांच्याकडे पुरेसे संख्याबळ असल्याने त्यांचे विधिमंडळाच्या लढाईत पारडे जड असल्याचे दिसून येत आहे. यापार्श्वभूमीवर शिवसेनेचे प्रवक्ते संजय राऊत यांनी बंडखोरांवर टीकास्त्र सोडत म्हणाले की, काल म्हणे गुवाहाटीत गेलेल्यांनी एकमेकांचे कपडे फाडले. त्यामुळे सकाळी उठल्या उठल्या तेथील दुकाने उघडताच नव्या चड्या आणि बनियन मागविल्याचे कळते. त्यामुळे ते आता चड्डी-बनियनवाली टोळी बनल्याचे ऐकण्यात येत अशी खोचक टीका केली.
तसेच पूर्वी एक चड्डी-बनियन गँग अस्तित्वात होती. मात्र आता त्यातले अर्धे अधिक तुरुंगात असल्याचेही त्यांनी सांगितले.
दहिसर येथे आज आयोजित शिवसेना मेळाव्यात संजय राऊत बोलत होते. यावेळी स्थानिक पदाधिकारी मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.
आता मला सगळ्यात मोठा प्रश्न पडलाय की, आता किरीट सोमय्याचे काय होणार. दररोज सकाळी झाली की सोमय्या याचे रोज एकच काम असायचे की, मी प्रताप सरनाईक यांना पाठविणार, मी यशवंत जाधव यांना तुरुंगात पाठविणार आता हेच दोघे त्यांच्या सांगण्यावर कळपात शिरलेत. त्यामुळे आता सोमय्या बेरोजगार होणार असा कुत्सित टोला त्यांनी लगावला.
त्यादिवशी प्रताप सरनाईक यांचा मला फोन आला, म्हणाले माझी केसची सर्वोच्च न्यायालयात तारीख आहे म्हणून. नंतर संध्याकाळी फोन केला म्हणाले देवेंद्र फडणवीस यांची दिल्लीत भेट झाली. फडणवीसांनी मला घेवून अमित शाह यांची भेट घालून दिली. अन् अमित शाह यांनी मला आश्वासन दिले की माझ्या विरोधातील ज्या काही ईडी-फिडीच्या केसेस आहेत त्या सगळ्या थांबवणार म्हणून. त्यामुळे मी सूरतला जातो आणि तेथून गुवाहाटीला जाणार असे सरनाईक यांने सांगितले. यावरून लक्षात घ्या यांच्याकडे कोणत्या ब्रॅण्डची वॉशिंग मशिन आहे की त्यात भ्रष्टाचारी माणसाला घातले की, तो लगेच स्वच्छ होतो असा उपरोधिक टोलाही त्यांनी लगावला.
शिवसेनेत फक्त शिवसैनिकांनाच स्थान आहे, आम्हाला पाहिल्यावर याच्या नादाला लागायला नको म्हणून पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शाह रस्ता बदलतात असे सांगत गुवाहाटीमध्ये त्यांनी काल रात्री एकमेकांचे कपडे फाडल्याचे समजले. त्यामुळे त्यांनी गुवाहाटीमधील दुकाने उघडल्यानंतर सकाळी चड्डी बनियान आणायला सांगितले. ती आता चड्डी बनियान टोळी झाली आहे. शिवसेना कोणाला नष्ट करता येणार नाही. मला जे बोलायचे आहे ते मी बोललो आहे. मी सतत बोलत राहतो आणि मला बोलावेच लागेल. शंकरराव बोरकर मान हलवू नका. भूम पराड्यांला जा तिथे एक लफंगा पळून गेला आहे. नाव तानाजी आणि कृत्य सूर्याजी पिसाळ आणि खंडोजी खोपडेचं. हे सगळं थांबले पाहिजे आणि आपल्यातील गद्दार शोधले पाहिजेत, असा कानमंत्रही त्यांनी यावेळी दिला.
संजय राऊत कोणी नाही. पण शिवसेना या चार अक्षरांनी आम्हाला राष्ट्रीय नेता केले आहे. आज कुठेही जा बाळासाहेब ठाकरेंचा वाघ आहे, तो शिवसेनेमुळे म्हणतात. आम्हाला पाहिल्यावर याच्या नादाला लागायला नको म्हणून मोदी आणि शाह रस्ता बदलतात. कोणाची हिंमत नाही आमच्या हाताला धरुन बाजूला खेचायची. हा बाळासाहेब ठाकरेंचा शिवसैनिक आहे याच्या नादाला लागू नका म्हणतात. याच्या हातात भगवा झेंडा आहे. वेळ पडली तर झेंडा खिशात ठेवेल आणि दांडा बाहेर काढेल असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.
जर आपण महानगरपालिका प्रचंड बहुमताने जिंकलो तर गुवाहाटीला बसलेले ४० चोर कायमचे मातीत गाडले जातील. शिवसेनेमधील ही किड कायमची संपून जाईल. त्यांना शिवसेनेने काय नाही दिले. अनेकांवर अन्याय करत त्यांना संधी दिली आहे. पण आता हे होणार नाही. असा अन्याय होईल तेव्हा आमच्यासारखे लोक उभी राहतील आणि सांगतील की हे होता कामा नये. हे लोक कुठून येतात आणि यांना कोण आणतं हे मला सगळं माहिती आहे असेही ते म्हणाले.
शरीर वाघाच अनं काळीज उंदराच अशी उपरोधिक टीका गुलाबराव पाटील यांच्यावर करत आता गुलाबराव पाटील परत पानटपरीवर बसतील. माझा शब्द कधी खोटा ठरत नाही हा इतिहास आहे. संदिपान भुमरेंना तिकीट मिळाले तेव्हा ते साखर कारखान्यावर सुरक्षा रक्षक होते. त्यानंतर ते मुंबईला आहे. त्यांना वडा सांबर खाता येत नव्हते. जमिनीवर बसून वडा सांबर खात होते आणि आज ते कॅबिनेट मंत्री झाले. त्यानंतर ते उद्धव ठाकरेंकडे गेले. त्यानंतर माझ्याकडे आले. त्यावेळी ते शिवसेनेने मला मोठे केले असं म्हणत रडत होते. ते अश्रू खोटे होते असेही ते म्हणाले.
महाराष्ट्राचा आणि देशाचे बिग बॉस कोणी असतील तर बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरे आहेत. ज्यांना जायचे आहे त्यांना जावू द्या. प्रकाश सुर्वे भाजी विकत होते. आता परत त्यांना भाजी विकायला पाठवू या. प्रकास सुर्वे परत विधानसभेत दिसणार नाहीत असा इशाराही त्यांनी दिला.