Breaking News

“त्या” ऑडिओ क्लिपमुळे शिवसेनेतील संदोपदी उघड, कदम संशयांच्या भोवऱ्यात माजी आमदार संजय कदम यांच्या आरोपाने शिवसेनेत खळबळ

मुंबई : प्रतिनिधी

राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब, मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचे विश्वासू मिलिंद नार्वेकर यांच्या कोकणातील मालमत्तांची कागदपत्रे शिवसेनेचे माजी मंत्री तथा नेते रामदास कदम यांनी भाजपा नेते किरीट सोमय्या यांच्याकडे माहिती अधिकार कार्यकर्त्ये तथा कदम यांचे पीए प्रसाद कर्वे यांच्या मार्फत पुरविल्याचा आरोप शिवसेनेचे माजी आमदार संजय कदम यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना केला. त्याचबरोबर मनसे नेते वैभव खेडकर यांनीही कदम यांनीच सरकार अस्थिर करण्यासाठी सोमय्यांना रामदास कदम यांनी कागदपत्रे पुरविल्याचा आरोप केला.

त्याचबरोबर रामदास कदम यांना मंत्रिपद मिळाले नाही म्हणून कदम यांनी सोमय्या यांना कागदपत्रे पुरविल्याचा आरोपही संजय कदम यांनी केला. तर वैभव खेडेकर यांनी राज्यातील सरकार अस्थिर करण्याचे जाणीवपूर्वक काम रामदास कदम यांनी केले असून सोमय्या हे रामदास कदम यांच्या घरी येत-जात होते. त्यांच्या जेवणावळी होत होत्या असा आरोपही त्यांनी केला.

यासंदर्भात जवळपास तीन ते चार ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्या असून यातील दोन ऑडिओ क्लिपमध्ये प्रसाद कर्वे आणि माजी मंत्री रामदास कदम यांच्यातील असल्याचे बोलले जात आहे. तर एक ऑडिओ क्लिप प्रसाद कर्वे आणि किरीट सोमय्या यांच्या दरम्यान असलेल्या संभाषणाची असल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच या ऑडिओ क्लिप मोठ्या प्रमाणावर प्रसारमाध्यमांमध्ये प्रसारीत झाल्याचे दिसून येत आहे. यासंदर्भात व्हायरल झालेल्या ऑडिओतील आवाजाबाबत कोणीही पुष्टी दिलेली नाही.

या ऑडिओ क्लिपच्या अनुषंगाने काही प्रसारमाध्यमांनी थेट रामदास कदम यांच्याशी संपर्क साधला असता त्या ऑडिओ क्लिपमधील शेवटची दोन वाक्ये माझी नसून माझ्या आवाजाची कोणी तरी मोडतोड केलेली असल्याचे सांगत यासंदर्भात आपण पोलिसांमध्ये तक्रार दाखल करणार असून शपथेवर सांगतो त्यातील आवाज माझा नसून असे पाप आपण कधीही करणार नाही. तसेच किरीट सोमय्या यांच्याशी मी कधीही बोललो नाही की भेटलो नाही असा खुलासा केला.

दरम्यान, या ऑडिओ क्लिपमुळे शिवसेनेत एकच खळबळ उडाली असून शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे हे कोणता निर्णय घेतात याकडे सबंध राज्याचे लक्ष लागून राहीले आहे. आतापर्यत महाविकास आघाडी सरकारला अस्थिर करण्यामागे भाजपा करत असल्याचा आरोप सातत्याने आघाडीच्या नेत्यांनाकडून करण्यात येत होता. मात्र आता या अस्थिरतेमागे शिवसेना नेताच असल्याची माहिती पुढे येतेय. त्यामुळे महाविकास आघाडीतील काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस सावध झाले आहेत.

Check Also

प्रकाश आंबेडकर यांचा अल्टीमेटम, महाविकास आघा़डीला २६ मार्च पर्यंतची मुदत

आगामी लोकसभा निवडणूकीत काहीही करून भाजपाला केंद्रातील सत्तेत जाण्यापासून रोखण्यासाठी राज्यातील महाविकास आघाडीतील काँग्रेस, राष्ट्रवादी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *