शिवसेना (ठाकरे गट) आणि वंचित बहुजन आघाडी यांच्यातील युतीची घोषणा आज पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी केली. मात्र, दोन्ही पक्षांमध्ये युती झाली असली, तरी वंचित बहुजन आघाडी हा महाविकास आघाडीचा भाग असेल का? याबाबत अद्यापही स्पष्टता नाही. दरम्यान, याबाबत उद्धव ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर यांनी आज दादरमधील आंबेडकर भवन येथे पत्रकार परिषेद घेत युतीची घोषणा केली. यावेळी पत्रकारांनी त्यांना वंचित बहुजन आघाडी महाविकास आघाडीचा भाग असेल का? असा प्रश्न विचारला. याबाबत बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, प्रकाश आंबेडकरांनी त्यांचे राष्ट्रावादी काँग्रेसशी असलेले संबंध सांगितले. आमचेही तीन वर्षांपूर्वी राष्ट्रवादीशी कसे संबंध होते, हे जगजाहीर आहे. परंतू ज्यावेळी आमच्या लक्षात आलं की फसवणुकीचं राजकारण सुरू आहे. त्यावेळी आम्ही महाविकास आघाडी तयार करण्याचा निर्णय घेतला, अशी प्रतिक्रिया उद्धव ठाकरे यांनी दिली.
यावेळी बोलताना उध्दव ठाकरे म्हणाले, आम्ही महाविकास आघाडीचा निर्णय घेतला, तेव्हा शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी एकत्र येतील का? अशी चर्चा सुरू होती. त्यानंतर आमच्यावर विचित्र आरोप झाले. त्या सर्वांना आम्ही पुरून उरलो. साधारण अडीच वर्ष महाविकास आघाडीचं सरकार आम्ही यशस्वीपणे चालवलं. मुळात हेतू चांगला असेल तर पुढच्या सर्व गोष्टी चांगल्या होतात. आम्हाला काल रात्री स्वप्न पडलं आणि आम्ही आज एकत्र आलो असं नाही. यापूर्वी आमच्या बैठका झाल्या आहेत. काँग्रेस आणि राष्ट्रवादी बरोबरही आमची चर्चा झाली आहे. मात्र, वंचित बहुजन आघाडी महाविकास आघाडी बरोबर येण्यास कोणाचीही हरकत नाही.
पुढे बोलताना उध्दव ठाकरे म्हणाले की, वंचित बहुजन आघाडी आणि आम्ही एकत्र येण्याचे ठरवले आहे. पुढे राजकीय वाटचाल कशी असेल. आणखी पुढे काय करता येईल या सर्व गोष्टींचा त्या-त्या वेळेला जशी वेळ येईल तसा विचार केला जाईल. आज जे काही देशात चालू आहे ते तळागाळातील जनतेपर्यंत पोहोचवणे गरजेचे आहे. तसेच काल-परवा पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईत येऊन गेले. निवडणुका आल्यानंतर गरिबांचा उदोउदो करायचा. गरिबांनी मतदान केल्यानंतर ते रस्त्यावर येतात. तर दुसरीकडे यांची उड्डाणं चालू होतात. हे सगळं थांबवण्याची गरज आहे. म्हणूनच आम्ही एकत्र आलो आहोत, असेही त्यांनी यावेळी त्यांनी सांगितले.
महाराष्ट्रातील जनता ज्याची निर्णयाची वाट बघत होती, आणि पुढची वाटचला एकत्र करण्यासाठी म्हणून या वास्तूमध्ये आलो आहोत. आंबेडकर आणि ठाकरे या नावाला इतिहास आहे. माझे आजोबा आणि प्रकाश आंबेडकरांचे आजोबा स्नेही होते. दोघांनीही समाजातील वाईट रुढी पंरपरा यांच्या विरोधात आवाज उठवला. याबद्दल आम्ही दोघांनी वेगळं सांगायाची आवश्यकता नाही. सध्या राजकारणात ज्या वाईट रुढी परंपरा सुरू तो त्या मोडून टाकण्यासाठी आम्ही एकत्र आलो आहोत अशी ग्वाहीही उद्धव ठाकरे यांनी दिली.