भाजपाला राजकिय टक्कर देण्याच्या उद्देशाने शिवसेनेकडून उत्तर प्रदेशात ४० ते ५० उमेदवार उभे करण्यात आले. या उमेदवारांच्या प्रचारासाठी दस्तुरखुद्द शिवसेना नेते आदित्य ठाकरे आणि प्रवक्ते संजय राऊत हे गेले होते. त्यावेळी गोरखपूर आणि लखनौ येथील जाहीर सभेत संजय राऊत यांनी केलेल्या भाषणात उमेदवार गौरव वर्मा हे विधान सभेत जाणार आणि उत्तर प्रदेशच्या राज्य मंत्रिमंडळात मंत्री होणार असे भाकित केले.
परंतु या गौरव वर्मा यांना संध्याकाळी सात वाजेपर्यत अवघी १३७ मते मिळाली आहेत. यावरून नेटकऱ्यांनी संजय राऊत यांच्या त्या प्रचार सभेचे मीम्स बनवित समाज माध्यमातून ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे.
एका नेटकऱ्याने तर संजय राऊत यांच्या मंत्र्याला विधानसभेच्या निवडणूकीत सकाळी अवघी २२ मते मिळाल्याची बोचरी प्रतिक्रिया व्यक्त केली.
तर दुसऱ्या एका नेटकऱ्याने या शिवसेनेचे उत्तर प्रदेशात डिपॉझिट जप्त अशी प्रतिक्रिया व्यक्त केली.
परंतु शिवसेनेने उभे केलेल्या अनेक उमेदवारांना आपले डिपॉझिटही वाचविता आले नाही.
दरम्यान, संजय राऊत यांना यासंदर्भात विचारले असता ते म्हणाले की, आमची लढाई अद्याप संपलेली नाही. अद्यापही आणि यापुढेही सुरुच राहणार.
तर शिवसेना नेते आदित्य ठाकरे म्हणाले की, आम्ही आणखी नेटाने काम करू आणि जनतेचा पाठिंबा मिळवू.