Breaking News

वेदांतावरून आदित्य ठाकरे म्हणाले, स्वतःसाठी खोके अन महाराष्ट्राला धोके महाराष्ट्रातून गेली गुजरातला जाण्यावरून साधला शिंदे सरकारवर निशाणा

मागील दिड वर्षापासून महाराष्ट्रात फॉक्सकॉन-वेदांता प्रकल्प सुरु करण्याच्या अनुषंगाने सातत्याने राज्य सरकारकडून चर्चेच्या फेऱ्या सुरु होत्या. मात्र आज अखेर वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातला हलविण्यात आल्याची माहिती वेदांता ग्रुपचे प्रमुख अनिल अग्रवाल यांनीच ट्विटवरून दिली. यावरून शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर निशाणा साधत खोचक शब्दात टीका केली.
यावेळी बोलताना शिवसेना नेते आदित्य ठाकरे म्हणाले, वेदांतचा हा प्रकल्प महाराष्ट्रात येणार, हे जवळपास निश्चित झालं असताना हा प्रकल्प गुजरातला गेलाच कसा? असा सवाल आदित्य ठाकरेंनी उपस्थित करत स्वत:साठी खोके आणि महाराष्ट्राला धोके, असं हे सरकार असल्याची टीका केली.

शिवसेना भवनात आयोजित पत्रकार परिषदेत आदित्य ठाकरे बोलत होते. यावेळी त्यांच्यासोबत तत्कालीन माजी उद्योग मंत्री सुभाष देसाई हे ही उपस्थित होते.

वेदांतचा संबंधित प्रकल्प महाराष्ट्रात यावा, यासाठी आम्ही मागील अनेक दिवसांपासून चाचपणी करत होतो. अनेक बैठका घेत होतो. हा प्रकल्प महाराष्ट्रात येणार हे जवळपास ९५ टक्के निश्चित झालं होतं. स्वाक्षरी झाल्यानंतर १०० टक्के प्रकल्प महाराष्ट्रात आला असता. संबंधित कंपनीने पुण्याजवळील तळेगाव येथे प्रकल्प उभारण्यासाठी जागा निश्चित केली होती. सर्वकाही सकारात्मक घडत असताना, एवढा मोठा प्रकल्प गुजरातला कसा काय गेला? असा प्रश्न आम्हाला पडला असल्याचे ते म्हणाले.

सुभाष देसाई आणि मी वेदांत कंपनीसोबत चर्चेच्या अनेक फेऱ्या पार पाडल्या. २१ जानेवारी २०२२ रोजी आमची वेदांत आणि फॉक्सकॉनच्या उद्योगाबाबत चर्चा झाली. त्यानंतर जागा निश्चितीसाठी मराठवाडा, विदर्भ आणि पुणे विभागात अनेक ठिकाणी पाहणी करण्यात आली. शेवटी पुण्याजवळील तळेगाव येथील जागा निश्चित केली. हा उद्योग गुजरातमध्ये जाण्याबाबत किंवा कुठेही इतरत्र जाण्याबाबत दु:ख नाही. पण ही कंपनी महाराष्ट्रात येणार हे ९५ टक्के ठरलं असताना, शेवटच्या क्षणी ही गुंतवणूक दुसरीकडे का गेली? हा प्रश्न असल्याचा सवालही त्यांनी केला.

महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा उद्योग पावणे दोन लाख कोटींचा आहे. या उद्योगासोबत १०७ इतर छोटे-मोठे उद्योग उभे राहणार होते. याच्या माध्यमातून ७० हजार ते १ लाख रोजगार निर्माण होणार होते. सध्या महाराष्ट्रात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर आहे. हे वातावरण महाराष्ट्राच्या विकासासाठी चांगलं नाही. आगामी काळात क्युबिक, एअर बस किमान हे प्रकल्प तरी महाराष्ट्रात यावेत, अशी आमची इच्छा आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारच्या वेळीही मुंबईतील अनेक उद्योग अहमदाबादला गेले. स्वत:साठी खोके आणि महाराष्ट्रासाठी धोके, असं हे सरकार असल्याची टीकाही त्यांनी यावेळी केली.

‘बाजीगर’ चित्रपटात एक डायलॉग आहे, ‘हार के जीतने वाले को बाजीकर कहते है’, पण या गुंतवणुकीच्या बाबतीत, जीत के हारनेवाले को खोके सरकार कहते है, असं लागू होतं अशा शब्दांत आदित्य ठाकरेंनी शिंदे सरकारवर निशाणा साधला.

Check Also

भाजपाचे शरद पवार यांना प्रत्युत्तर,… संविधान बदलाच्या अफवा

पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या गॅरंटीपुढे निभाव लागत नाही, त्यामुळे आता भारताचे संविधान बदलणार अशा अफवा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *