शिवसेनेत झालेल्या बंडाळीमुळे राज्यातील महाविकास आघाडी अल्पमतात आल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील अनेक आमदार एकनाथ शिंदे यांच्या समर्थनासाठी गुवाहाटीला जात आहेत. त्यामुळे सांसदीय राजकारणात लागणारे एकतृतीयांश संख्या एकनाथ शिंदे हे पूर्ण करताना दिसत आहेत. तर शिवसेनेकडून ही बंडाळी क्षमविण्यासाठी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्यासह अनेकांकडून प्रयत्न करण्यात येत आहे. परंतु अद्याप तरी बंड क्षमता दिसून येत नसल्याचे स्पष्ट होत चालले आहे. त्यामुळे शिवसेनेसह महाविकास आघाडीच्या घटक पक्षांमध्ये थोडीशी अस्थिरतेची भावना निर्माण झाली असतानाच काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मोठे विधान केले असून या षडयंत्रामागे भारतीय जनता पार्टीच असल्याचा मोठा आरोप केला आहे.
तसेच महाराष्ट्रातील महाविकास आघाडीला कसलाही धोका नसल्याचा दावाही त्यांनी केला.
एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीबाबत विचारलं असता नाना पटोले म्हणाले, एकनाथ शिंदे यांच्या प्रस्तावाबाबत काय करायचं? हा शिवसेनेचा अंतर्गत प्रश्न आहे. महाविकास आघाडीला कोणताही धोका नाही. या सर्व षडयंत्रापाठीमागे भारतीय जनता पार्टी आहे. सध्याच्या घडीला तुम्ही मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या पाठीशी आहात का? असं विचारलं असता नाना पटोले म्हणाले की, बिलकुल आम्ही मुख्यमंत्र्यांच्या पाठीशी आहोत. काल सायंकाळी मी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली, आम्ही तुमच्यासोबत आहोत, असं सांगितलं. तसेच तुम्ही जे म्हणाल ते आम्ही करायला तयार आहोत, असं आश्वासनही दिल्याचे त्यांनी सांगितले.
महाविकास आघाडीच्या स्थापनेवेळी सोनिया गांधी यांनी जो आशीर्वाद दिला होता. तो आजही आमच्यासोबत कायम आहे. काँग्रेसचे सर्व आमदार त्यांच्यासोबत आहेत, असंही ते म्हणाले.
महाविकास आघाडी नको, वेगळा पर्याय हवा एकनाथ शिंदेच्या या प्रस्तावाबाबत विचारलं असता ते म्हणाले, आमची कोणालाही जबरदस्ती नाही, आधीही आमची कोणाला जबरदस्ती नव्हती आणि आजही नाही. विरोधी पक्ष म्हणून लोकांनी आम्हाला निवडून दिलं होतं. त्यामुळे आम्ही सत्तेत जाण्यासाठी त्यांच्याकडे गेलो नव्हतो. ते आमच्याकडे आले होते. भाजपाला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी आम्ही यांच्यामध्ये सामील झालो असेही त्यांनी सांगितले.