मागील दोन वर्षात कोरोनामुळे शाळा, महाविद्यालये पुरेशा क्षमतेने सुरु नव्हती. तसेच कोरोनामुळे प्रत्येक विद्यार्थ्यांच्या जीवाला एकप्रकारे धोका निर्माण झाला होता. त्यामुळे विद्यार्थ्यांना ऑनलाईन पध्दतीने शिक्षण देण्यात येते. परंतु या ऑनलाईन शिक्षणामुळे शिक्षकांनाही अभ्यासक्रम पूर्ण करता येत नव्हते. त्यामुळे शाळा आणि महाविद्यालयाच्या शैक्षणिक अभ्यासक्रमात २५ टक्के कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र यंदाच्या शैक्षणिक वर्ष २०२२-२३ पासून इयत्ता पहिली ते १२ वी साठी १०० टक्के पाठ्यक्रम लागू करण्यास शासनाने मान्यता दिली असल्याची माहिती, शालेय शिक्षण मंत्री प्रा.वर्षा गायकवाड यांनी दिली. तसेच याबाबतचा शासन निर्णय जारी करण्यात आला आहे.
दोन वर्षात फक्त ७५ टक्के अभ्यासक्रम फक्त शिकविल्यामुळे विद्यार्थ्यांवर फारसा अभ्यासक्रमाचा ताण आला नाही. तसेच त्यांचे शिक्षण सुरु राहिले. आता परिस्थिती सामान्य झाली असल्याने पुन्हा एकदा अभ्यासक्रम १०० टक्के करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याचबरोबर शाळा, महाविद्यालये सुरु करण्यात आल्याने आता विद्यार्थीही प्रत्यक्षरित्या वर्गात उपस्थित राहायला सुरु झाली आहे. तसेच विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होवू नये म्हणून पुन्हा एकदा अभ्यासक्रम १०० टक्के करण्याचा निर्णय घेण्यात आला.
मार्च २०२० पासून कोविड-19 च्या प्रादूर्भावामुळे निर्माण झालेल्या आपत्कालीन परिस्थितीमध्ये शाळा ऑनलाईन स्वरूपामध्ये सुरू होत्या. तसेच प्रत्यक्ष शाळेत अध्ययन-अध्यापन मर्यादित स्वरूपात होत असल्याने या कालावधीमध्ये विद्यार्थ्यांवरील अध्ययनाचा ताण कमी व्हावा यादृष्टीने शैक्षणिक वर्ष २०२०-२१ मध्ये इयत्ता पहिली ते १२ वी चा पाठ्यक्रम २५ टक्के कमी करण्यात आला होता. तसेच ही परिस्थिती कायम राहिल्याने कमी केलेला पाठ्यक्रम २०२१-२२ या शैक्षणिक वर्षासाठी देखील कायम ठेवण्यात आला होता.