मागील काही महिन्यापासून पेपर फुटीप्रकणावरून सर्वच परिक्षा वादाच्या भोवऱ्यात सापडल्यानंतर यास आळा घालण्यासाठी शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी आज विधान परिषदेत मोठी घोषणा केली असून एखादे शाळेत पेपर फुटीची घटना घडल्यास त्यासाठी शाळा व्यवस्थापनास जबाबदार धरून शाळेची मान्यताच रद्द करण्यात येणार आणि जर कॉपी प्रकरण आढळून आले तर त्या शाळेतील परिक्षा केंद्र काढून घेणार असल्याची मोठी घोषणा केली.
त्यासाठी परीक्षा काळात प्रत्येक केंद्रावर नजर ठेवण्यात येणार आहे. तक्रारी, त्यानंतर वस्तुस्थिती जाणून दोषी शाळांना ‘धडा’ शिकविला जाणार आहे. यासंदर्भातील निर्णयाची काटेकोरपणे अमंलबजावणी करून विद्यार्थ्याचे नुकसान होणार नसल्याची आशा या खात्याला आहे. राज्यात काही विविध परीक्षांच्या पेपर फुटीच्या घटनांत वाढ झाल्याने, त्यावरून गोंधळ उडत आहे. नोकरी भरतीच्या परीक्षात हा गोंधळ झाल्याने परीक्षा रद्द करण्याची नामुष्की सरकारवर आली. हा वाद सुरू असतानाच बारावीच्या परीक्षेतही पेपर फुटल्याच्या तक्रारी आहेत. त्यावर काही ठिकाणी पेपर फुटला नसल्याचे शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी सभागृहात स्पष्ट केले.
तरीही, काहीजणांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याचे त्यांनी सांगितले. त्यानंतरही परीक्षा केंद्रांवर अशा घटना घडल्याचे उघडकीस आले असून, त्यावर सभागृहात बुधवारी पुन्हा चर्चा झाली. यापुढच्या काळात पेपर फुटल्याच्या तक्रारी आल्यास, त्याची चौकशी करून संबधित शाळेतील परीक्षा केंद्राची मान्यता काढण्याची ठोस भूमिका घेतली जाईल, असे गायकवाड यांनी स्पष्ट केले.
यासंदर्भात विधान परिषदेत प्रश्न उपस्थित करण्यात आला होता. त्यास उत्तर देताना शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी वरील उत्तर दिले.
बारावीच्या परीक्षांचे पेपर फुटल्याच्या तक्रारी आल्यानंतर सर्व पातळ्यांवर चौकशी करण्यात येत आहे. याबाबत संबंधित यंत्रणा गाफील राहणार नाही, यासाठीची ताकीद देण्यात आली आहे. या परीक्षांत जिथे कुठे हे प्रकरण घडले आहेत, त्यातील काही तक्रारीत तथ्य नसल्याचेही शिक्षण खात्याच्या चौकशीत आढळून आल्याचे त्यांनी सांगितले.
पेपर फुटी आणि कॉपीच्या प्रकारांमुळे विद्यार्थ्यांत भीतीचे वातावरण असल्याचे दिसून आले. त्यामुळे परीक्षांच्या काळात केंद्रांवर बंदोबस्तातील पोलिसांची संख्या वाढविण्यात येणार आहे. याबाबत गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांच्याशी चर्चा झाली आहे. त्यानुसार प्रत्येक केंद्रात पुरेसे पोलिस बंदोबस्त ठेवण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.