राज्यसभा निवडणूकीतील उमेदवारीवरून संभाजी राजे यांनी पत्रकार परिषद घेत मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी शब्द फिरवल्याचा आरोप केला. त्यानंतर भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी आणि शिवसेनेवर टीकेची झोड उठविली.
त्यातच आज कोल्हापूर दौऱ्यावर असलेल्या शिवसेनेचे प्रकक्ते संजय राऊत यांनीही भाजपावर टीकेची झोड उठविली. त्यामुळे संभाजी राजे यांच्या उमेदवारीवरून राजकिय वातावरण चांगलेच तापले.
यापार्श्वभूमीवर श्रीमंत शाहु महाराज यांनी संभाजी राजे यांनी मुख्यमंत्र्यांबाबत केलेले वक्तव्य दुर्दैवी असल्याचे मत व्यक्त करत संभाजी राजेंना त्या मुख्यमंत्र्यांनी भेटी दरम्यान काय सल्ला दिला? हे माहीत नाही. त्यासंदर्भात कोठेच छापून आले नसल्याचे वक्तव्य केले. कोणते मुख्यमंत्री असे विचारले असता माजी मुख्यमंत्र्यांनी फडणवीसांनी असे स्पष्ट केले.
श्रीमंत शाहु महाराजांच्या या वक्तव्यामुळे संभाजी राजेंना मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यावरून कान पिचक्या दिल्याचे दिसून येत आहे. तसेच या उमेदवारी नाट्यामागे एकप्रकारे देवेंद्र फडणवीसच असल्याचा अप्रत्यक्ष आरोपही त्यांनी केला.
जर मुख्यमंत्री उध्दव ठाकरे आणि संभाजी राजे यांच्या काही तरी फायनल झाले असते आणि ते म्हणतात त्याप्रमाणे त्या ड्राफ्टवर सह्या झाल्या असते तर ते बोलणे अंतिम झाले असते. आणि त्यानंतर मुख्यमंत्री ठाकरे यांनी वेगळे काही केले असते तर त्यांनी शब्द पाळला नाही असे म्हणणे योग्य ठरले असते. परंतु तसे काही झाल्याचे ऐकिवात नसल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
तसेच छत्रपतींच्या घराण्याचा नेहमीच सर्व राजकिय पक्षांनी सन्मान केला. त्यामुळे एखाद्या पक्षावर असा आरोपही करणे चुकीचे आहे. मात्र एक नक्की की संभाजी राजे यांना पुढे करून कपटी डाव खेळण्यात आल्याची टीकाही त्यांनी यावेळी केली.
याशिवाय संभाजी राजे यांना तिकिट दिले नाही याचा छत्रपतींच्या राजघराण्याची संबध नाही. ते तिकिट त्यांना वैयक्तिक पातळीवर नाकारले गेल्याचे मतही त्यांनी यावेळी व्यक्त केले.