उत्तर प्रदेशात काही महिन्यांपूर्वी झालेल्या विधानसभा निवडणूकीत समाजवादी पार्टीचे प्रमुख अखिलेश यादव यांनी चांगलीच लढत देत भाजपाचा जवळपास ५० जागांवर पराभव केला. तसेच ३०० पार असलेल्या भाजपाला २५० जागांवर रोखले. त्यानंतर आगामी लोकसभा निवडणूकीत ८० जागांवर भाजपाचा पराभव होऊ शकतो असे भाकित केले.
विशेष म्हणजे भाजपाने आगामी २०२४ च्या लोकसभा निवडणूकामध्ये विजय मिळविण्याच्या अनुषंगाने या आधीपासूनच आपली रणनीती आखली असून त्यादृष्टीने हिंदूत्ववादाचे आणि हिंदू विरूध्द मुस्लिम अशी वातावरण निर्मिती सुरु केली आहे. यापार्श्वभूमीवर अखिलेश यादव यांच्या वक्तव्याला महत्व आले आहे.
यावेळी बोलताना अखिलेश यादव म्हणाले, आगामी काही दशकं आम्ही देशावर राज्य करू असा दावा भाजपाकडून केला जात आहे. पुढील ५० वर्षे आम्हीच सत्तेत असू असे भाजपाचे नेते म्हणत आहेत. मात्र भाजपाच्या राष्ट्रीय अध्यक्षांनी एकदा उत्तर प्रदेशमधील दोन वैद्यकीय महाविद्यालयांना भेट द्यावी. मग त्यांना कळेल की येथे त्यांचा किती जागांवर विजय होऊ शकतो. कदाचित भाजपाचा यावेळी उत्तर प्रदेशमधील सर्व ८० जागांवर पराभव होऊ शकतो, असा इशारा दिला.
उत्तर प्रदेशमध्ये होणाऱ्या आर्थिक गुंतवणुकीवरूनही यादव यांनी भाजपाला लक्ष्य करताना म्हणाले, आम्ही लंडन, न्यूयॉर्क येथून राज्यात गुंतवणूक आणत आहोत, असा दावा त्यांच्याकडून केला जात होता. मात्र आता ते राज्यातीलच वेगवेगळ्या जिल्ह्यातून गुंतवणूक आणत आहेत. ते कोणाला मूर्ख बनवण्याचा प्रयत्न करत आहेत, असा खोचक सवालही केला.