वेदांत-फॉक्सकॉन’ प्रकल्पासंदर्भात ‘वेदांत’ समुहाने तळेगावमध्ये १.५ लाख कोटी रुपयांचा सेमिकंडक्टर निर्मितीचा कारखाना उभारण्यासाठी महाराष्ट्र सरकारकडून दोन गोष्टींची मागणी केल्याची माहिती समोर आली आहे. तळेगावमध्ये हा प्रकल्प निश्चित करण्यापूर्वी अंतिम निर्णय घेण्याआधी केंद्र सरकारचा पाठिंबा आणि राज्य सरकारच्या मंत्रिमंडळाकडून संमती या दोन गोष्टींची मागणी ‘वेदांत’कडून करण्यात आली होती. या दोन्ही मागण्यांचा उल्लेख मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीच ‘वेदान्त’चे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांना पाठवलेल्या पत्रात केला होता. तसेच कंपनीला त्यांच्या मागण्याच्या संदर्भात आश्वासनही देण्यात आल्याची माहिती पुढे आली आहे.
मुख्यमंत्री शिंदेंनी पाठवलेल्या पत्रामध्ये, तुमच्या दोन महत्त्वाच्या मागण्या केंद्र सरकाकडून पाठिंबा मिळवणे आणि मंत्रिमंडळाकडून मान्यता मिळवण्याच्या आहेत. या दोन्ही मागण्यांसंदर्भात राज्य सरकार काम करत असून अत्यंत वेगवान पद्धतीने निर्णय घेतले जात आहेत, असं नमूद केलं होतं. हे पत्र शिंदे यांनी २६ जुलै रोजी पाठवलं होतं. ३० जून रोजी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर महिन्याभराच्या आत शिंदेंनी केंद्र सरकाकडून पाठिंबा मिळवण्यासंदर्भात हलचाली सुरु असल्याची ग्वाही कंपनीच्या अध्यक्षांना दिली होती.
शिंदे यांनी ‘वेदांत’चे अध्यक्ष अग्रवाल यांच्याबरोबरच कंपनीचे अधिकारी, ‘फॉक्सकॉन’ आणि ‘अवॅनस्टॅरेट’ कंपन्यांसोबत सामंजस्य करार करण्यासाठी २९ जुलै रोजी दुपारी १२ वाजताचं आमंत्रण दिले होते. या पत्रामध्ये शिंदे यांनी आपल्याकडून पूर्ण सहकार्य केलं जाईल असं नमूद करण्यात आलं होतं. कंपनीला राज्याकडून उत्तम सवलती दिल्या जातील आणि यासंदर्भात मंत्रिमंडळाकडून मान्यता घेतली जाईल असंही आश्वासन देण्यात आलं होतं.
महाराष्ट्राचे उद्योगमंत्री उदय सामंत यांना या पत्रानंतर नेमकं काय असं घडलं की प्रकल्प राज्याच्या बाहेर गेला याबद्दल विचारणा केली. त्यावर सामंत म्हणाले की, अग्रवाल यांचे ट्वीट पाहिल्यास त्यांनी पूर्वीच गुजरातमध्ये गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला होता असं वाटतं आहे. सामंत यांनी अग्रवाल यांच्या गुरुवारच्या ट्वीटचा दाखला दिला आहे.