Breaking News

नाना पटोले यांचा इशारा, विधिमंडळाचे विशेष अधिवेशन नाही बोलावले तर… मविआच्या वज्रमूठ सभा रद्द केल्या नाहीत, नैसर्गिक संकटामुळे सभांचे फेरनियोजन करु

राज्यासमोरील प्रश्नांसदर्भात राज्यपाल रमेश बैस यांची काँग्रेस शिष्टमंळाने भेट घेऊन दोन दिवसीय विशेष अधिवेशन बोलवण्याचे निर्देश राज्य सरकारला द्यावेत अशी विनंती करण्यात आलेली आहे. राज्याच्या हितासाठी राज्यपाल काँग्रेसच्या मागणीचा सहानुभूतीने विचार करतील अशी अपेक्षा आहे. विशेष अधिवेशन बोलावले नाही तर काँग्रेस जनतेच्या प्रश्नांसाठी राज्यभर रस्त्यावर उतरुन तीव्र आंदोलन करेल, असा इशारा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी दिला.

प्रसार माध्यमांशी बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे, सरकार शेतकऱ्यांना मदत करत नाही, ही मदत तात्काळ मिळावी, बारसू रिफायनरी प्रकल्पासाठी स्थानिक लोकांवर पोलीस अत्याचार करत आहेत. खारघरमध्ये सरकारच्या ढिसाळ नियोजनाने १४ लोकांचे बळी गेले, त्याप्रकरणात अद्याप कारवाई केली जात नाही या व राज्यातील इतर महत्वाच्या प्रश्नावर चर्चा होणे गरजेचे आहे म्हणून दोन दिवसांचे विशेष अधिवेशन घेण्याची मागणी केलेली आहे.

मुंबईचे महत्व कमी करण्याचा भाजपा सरकारकडून प्रयत्न..

मुंबई, महाराष्ट्राचे महत्व कमी करण्याचा डाव भारतीय जनता पक्षाचे दिल्लीतील सरकार सातत्याने करत आहे. मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे, जगात मुंबई शहराला महत्वाचे स्थान आहे, सर्व महत्वाच्या आर्थिक संस्था, विविध कंपन्यांची मुख्यालये मुंबईत आहेत, मुंबईचे हे महत्व भाजपाच्या डोळ्यात खुपत आहे. मुंबईतील महत्वाची कार्यालये गुजरातली हलवून मुंबईचे महत्व कमी करण्याचे प्रयत्न सातत्याने केले जात आहेत. बुलेट ट्रेनची गरज नसताना ती मुंबई व महाराष्ट्रावर लादली जात आहे. मुंबईतल्या ‘बीकेसी’मध्ये होणारे आंतरराष्ट्रीय आर्थिक सेवा केंद्र गांधीनगरला हलवण्यात आले. पेटंट, डिझाईन आणि ट्रेडमार्कचे ऑफिस दिल्लीला हलवले, नॅशनल मरीन पोलीस अकादमी पालघरहून गुजरातमधल्या द्वारकाला हलवण्यात आली. मुंबईमध्ये हिऱ्यांचा मोठा उद्योग पंचरत्न बिल्डिंगमध्ये होता यातील एक मोठा गट गुजरातला गेला. मुंबई व राज्यातील महत्वाची कार्यालये व प्रकल्प दिल्लीच्या इशाऱ्यावर राज्याबाहेर स्थलांतरीत करण्यात आली. मुंबई गुजरातला नेता येत नाही म्हणून ती उद्ध्वस्त करण्याचा भाजपाचा डाव आहे.

वज्रमूठ सभांचे फेरनियोजन….

राज्यात महाविकास आघाडीच्या वज्रमूछ सभांना जनतेचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. छत्रपती संभाजी नगर, नागपूर व मुंबई अशा तीन वज्रमूठ सभा झालेल्या आहेत. पुणे, नाशिक, कोल्हापूर व अमरावती येथे पुढील सभा होणार आहेत. परंतु मागील काही दिवसात वादळी वाऱ्यासह पाऊस पडत आहे. त्यामुळे सभांचे वेळापत्रक बदलण्याचा विचार झालेला आहे, वज्रमुठ सभा रद्द केलेल्या नाहीत. उद्धव ठाकरे व राष्ट्रवादीचे नेते यांच्याबरोबर या विषयावर चर्चा झालेली आहे, लवकरच या सभांचे फेरनियोजन केले जाईल, असेही काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी स्पष्ट केले.

Check Also

अखेर भाजपाचा “संकल्प पत्र” जाहिरनामा प्रसिध्द

देशातील प्रमुख राष्ट्रीयस्तरावरील पक्षांकडून लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर मतदारांना आकृष्ट करण्यासाठी जाहिरनामा प्रसिध्द केला. आतापर्यंत मार्क्सवादी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *