शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारच्या काळात हनुमान चालिसावरून रान पेटविणारे रवि राणा आणि त्यांच्या पत्नी नवनीत राणा यांचे भाजपाबरोबरील सख्य काही लपून राहिले नाही. तसेच हनुमान चालिसावरून उध्दव ठाकरे आणि शिवसेनेला जेरीस आणणाऱ्या रवि राणा यांचा या नव्या सरकारमध्ये समावेश होईल असे सांगण्यात येत असताना पहिल्या मंत्रिमंडळात त्यांचा समावेश होवू शकला नाही. यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी रवि राणा यांना खोचक टोला लगावत मंत्रिमंडळातील सहभागासाठी देवेंद्र चालिसा म्हणा असे वक्तव्य केले.
रवी राणा आणि त्यांच्या पत्नी नवनीत राणा यांनी हनुमान चालीसा पठनाच्या मुद्द्यावरून जोरदार मोहीम उघडली होती. अगदी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या घरासमोरच हनुमान चालीसा पठन करण्याचा देखील त्यांनी घाट घातला होता. मात्र, त्याआधीच त्यांना अटक करण्यात आली. या पार्श्वभूमवीर रवी राणा यांचा मंत्रिमंडळात समावेश होणार असल्याचा अंदाज बांधला जात होता. मात्र, तो अंदाज फोल ठरला.
यासंदर्भात ट्वीट करताना अमोल मिटकरी यांनी रवी राणा वैफल्यग्रस्त झाल्याचं म्हटलं आहे. हिंदुत्वासाठी जिवाचं रान करणारे रवी राणा, हनुमान चालीसा खिशात घालून फिरणारे रवी राणा अखेर वैफल्यग्रस्त झाले आहेत असे ट्विट करत टीका केली.
या ट्वीटमध्ये मिटकरींनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा देखील उल्लेख केला आहे. तसेच, रवी राणा यांना मंत्रीपद मिळायलाच हवं, अशी खोचक शब्दांत मागणी देखील केली आहे. देवेंद्र फडणवीस ठरवतील त्यांना मंत्रीपद मिळतं, याचा अर्थ त्यांना (रवी राणा) नव्याने ‘देवेंद्र चालीसा’ वाचण्याची गरज आहे. रवी राणा यांना धर्म रक्षणार्थ मंत्रीपद मिळायलाच हवे, असा खोचक टोलाही त्यांनी लगावला.
राज्य सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारानंतर सत्तेतील काही मित्रपक्षांनी नाराजी व्यक्त केली होती. बच्चू कडू यांनी ती माध्यमांसमोर बोलून देखील दाखवली होती. या पार्श्वभूमीवर शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी बच्चू कडूंना चांगलं खातं मिळेल, असं म्हटलं आहे. तसेच, पावसाळी अधिवेशन संपल्यानंतर अर्थात सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात दुसरा मंत्रीमंडळ विस्तार होणार असल्याचे देखील ते म्हणाले.
हिंदुत्वासाठी जीवाचं रान करणारे रवी राणा ,हनुमान चालीसा खिशात घालुन फिरणारे रवी राणा, अखेर वैफल्यग्रस्त झालेत.देवेंद्र फडणवीस ठरवतील त्यांना मंत्री पद मिळतं याचा अर्थ त्यांना नव्याने"देवेंद्र चालीसा" वाचण्याची गरज आहे. रवीराणा यांना धर्म रक्षणार्थ मंत्रिपद मिळालेच पाहिजे.
— आ. अमोल गोदावरी रामकृष्ण मिटकरी (@amolmitkari22) August 11, 2022