नॅशनल हेराल्ड आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी राहुल गांधी यांना सोमवारी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) हजर राहण्याचे समन्स बजावले होते. त्यानुसार राहुल गांधी हे ईडी कार्यालयाकडे जाण्यास निघाले असता त्यांच्यासोबत काँग्रेसचे हजारो कार्यकर्त्ये ही ईडी कार्यालयातकडे निघाले. ईडीने राहुल गांधी यांची पहिल्यांदा तीन तास चौकशी केली. त्यानंतर काही वेळानंतर पुन्हा एकदा त्यांची चौकशी सुरु केल्याचे समजते. मात्र त्यांची कितीवेळ चौकशी सुरु राहणार याबाबत अद्याप कोणतीही माहिती पुढे आली नाही.
चौकशीत नेमकं काय झालं याची माहिती अद्याप समोर आलेली नाही. दरम्यान बाहेर आल्यानंतर राहुल गांधी रुग्णालयात दाखल असलेल्या सोनिया गांधींना भेटण्यासाठी पोहोचले होते. यानंतर चौकशीच्या दुसऱ्या फेरीसाठी ते पुन्हा ईडी कार्यालयात दाखल झाले. तत्पूर्वी राहुल गांधी ईडी कार्यालयात पोहोचण्याआधी नेत्यांनी, कार्यकर्त्यांनी त्यांच्या समर्थनात घोषणाबाजी केली. यानंतर दिल्ली पोलिसांनी या नेत्यांना, कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं.
राहुल गांधी चौकशीला हजर राहणार असल्याने नवी दिल्लीतील काँग्रेस कार्यालयाबाहेर पक्षाचे नेते आणि समर्थक मोठ्या संख्येने जमले होते. देशभरात ठिकठिकाणी काँग्रेस कार्यकर्त्यांकडून आंदोलन करण्यात आले. दिल्लीमध्ये प्रियंका गांधी यांनी पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या नेत्यांची भेटही घेतली.
राहुल गांधी ईडी कार्यालयात पोहोचले तेव्हा पक्षाच्या सरचिटणीस प्रियंका गांधी सोबत होत्या. कार्यकर्त्यांच्या घोषणाबाजीतच राहुल गांधी ईडी कार्यालयात पोहोचले होते. ईडी कार्यालयाबाहेर पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला होता. पोलिसांनी काँग्रेस नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना तिसऱ्या बॅरिकेडजवळ रोखलं. यानंतर राहुल आणि प्रियंका गांधी पुढे गेले असता नेते तिथेच बसून राहिले.
काही वेळाने पोलिसांनी काँग्रेस नेते, कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं आणि बसमधून पोलीस ठाण्यात नेण्यात आलं. प्रियंका गांधी या नेत्यांची भेट घेण्यासाठी तुघलक रोड पोलीस ठाण्यात पोहोचल्या होत्या.
पोलिसांनी मोर्चासाठी परवानगी नाकारली असल्याने ही कारवाई करण्यात आली. फक्त दिल्लीच नाही तर मध्य प्रदेश, महाराष्ट्र, आसाम, उत्तर प्रदेश आणि केरळसह इतर ठिकाणी काँग्रेसकडून आंदोलन करण्यात आलं.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह विरोधकांचे तोंड बंद करण्यासाठी केंद्रीय तपास यंत्रणांचा वापर करत असल्याचा काँग्रेसचा आरोप आहे. आपल्या नेत्यांविरोधात करण्यात आलेले आरोप खोटे आणि तथ्यहीन असून हे सूडाचं राजकारण असल्याचा दावा केला.
प्रकरणी सोनिया गांधी यांनाही समन्स बजावण्यात आलं आहे. कोरोना पॉझिटिव्ह असल्याने त्यांनी तपास यंत्रणेकडे वेळ मागितली आहे.