पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबई दौर्यावर येत असून या मुंबई दौऱ्यावरून राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी भाजपाबरोबर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दावोस दौऱ्यावरही निशाणा साधला. महाराष्ट्रामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी येत असल्याने त्यांचे आम्ही स्वागतच करतो. या भाजपामध्ये अटलबिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी, अरुण जेटली, यशवंत सिन्हा, सुषमा स्वराज यांच्यासारखे मोठे नेते पाहिले आहेत. मात्र आज यांसारखे नेते भाजपाकडे नाहीत. हे पाहून वाईट वाटत आहे. बिच्चारे पंतप्रधान नरेंद्र मोदींची काळजी वाटते, सरपंचपदाच्या निवडणुकांपासून देशातील कोणत्याही निवडणुकांसाठी मोदींना धावपळ करावी लागते आणि ते पक्षासाठी खूप कष्ट घेतात. तसेच प्रत्येक निवडणुकीमध्ये नरेंद्र मोदींशिवाय भाजपाकडे दुसरा नेता किंवा पर्याय नाही, अशा शब्दात सुप्रिया सुळे यांनी भाजपा नेत्यावर निशाणा साधला.
माथाडी कामगार नेत्यांच्या त्रासामुळे उद्योग बाहेर गेल्याचे विधान देवेंद्र फडणवीस यांनी केले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दावोस दौर्यात ८८ हजार ४२० कोटींचे करार झाला आहे. त्यामुळे लाखो तरुणांना रोजगार मिळतील अस म्हटलं जात आहे. त्यावर सुप्रिया सुळे म्हणाल्या की, राज्यात सर्वाधिक उद्योग आले आहेत. अनेक आकडेवारी मधून समोर आले आहे. त्यामुळे त्यांनी अशा प्रकारची विधान करणे योग्य नसून देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गृह विभाग आहे. हे लक्षात घेता, देवेंद्र फडणवीस यांनी गुन्हे कसे कमी होतील. याकडे लक्ष देण्याची गरज असल्याचे सांगत देवेंद्र फडणवीस यांच्यावर त्यांनी टीका केली.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दावोस दौर्याबाबत त्या म्हणाल्या की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा दावोस दौरा आणि ज्या प्लेनने आले. ते पाहून खूप छान वाटले. त्या दौऱ्यातील जे फोटो माझ्या पाहण्यात आले. त्या मधील काही उद्योजक हैदराबाद येथील आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दावोसला जाण्याची गरजच नव्हती. ते उद्योजक हैदराबाद येथून मुंबईत आले असते आणि तिथे करार झाले असते, अशा शब्दात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दावोस दौर्यावर त्यांनी टीका केली.