राजभवनावर सापडलेल्या गुप्त बंकरमध्ये देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात सहभागी झालेल्या ज्ञात-अज्ञात स्वातंत्र्य सैनिकांच्या कार्याला उजाळा देण्यासाठी स्मारक निर्माण करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार या स्मारकाचे उद्घाटन आज पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री उध्दव ठाकरे आणि राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या उपस्थितीत पार पडले. परंतु या कार्यक्रमातच मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या उपस्थितीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी तक्रारीच्या सुरात राज्यातील अनेक विकास कामे वर्षानुवर्षे सुरु असून त्याचा लाभ नागरीकांना मिळत नाही. मात्र मोदी है तो मुमकीन है असे म्हणत हे रखडलेले प्रकल्पही मोदी हेच मुमकीन करू शकतात असे स्पष्ट करत एकप्रकारे मुख्यमंत्री ठाकरे यांच्या कार्य पध्दतीबाबत तक्रार केल्याचे दिसून येत आहे.
राजभवन येथील ब्रिटिशकालीन बंकरमध्ये “क्रांती गाथा” या भूमिगत दालनाचे तसेच जल भूषण या नवीन इमारतीचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उदघाटन करण्यात आले. या कार्यक्रमास राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, जलसंपदा मंत्री जयंत पाटील, राजशिष्टाचार मंत्री आदित्य ठाकरे, राज्यमंत्री आदिती तटकरे, विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस आदी उपस्थित होते.
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी म्हणाले,राज्यात नवीन सरकार आल्यानंतर गेल्या दोन वर्षांत विकास महामंडळांवरील नियुक्त्या अदयाप झालेल्या नाहीत. नियुक्त्या झालेल्या नसल्या तरी ती माझ्या अखत्यारित येत असल्याने त्यांची समीक्षा मी करत असतो. राज्यातील अनेक सिंचन योजना अपूर्ण आहेत. काही तर ८० टक्के पूर्णही झालेल्या आहेत. पण त्यांचा लाभ मिळत नाही. मी औरंगाबादला गेलो होतो. तिथल्या लोकांनी सांगितले की तिथला पाणीप्रश्न बिकट आहे. पाच ते सात दिवस पाणीच मिळत नाही.
अरूण जेटली काही वर्षांपुर्वी म्हणाले होते की मोदी है तो मुमकिन है आता मी देखील म्हणतो की मोदी है तो मुमकिन है. त्यांनी या योजना पूर्ण कराव्यात. मी कुलपती देखील आहे. या नात्याने विदयापीठांच्या कार्यक्रमांना मी जात असतो. मुंबईतही विदयापीठांच्या कार्यक्रमांचे सूत्रसंचालन इंग्रजीत होते. वक्ते भाषणे देखील इंग्रजीत करतात. मी त्यांना सूचना दिली की सूत्रसंचालन तसेच भाषणेही मराठीतच करा. मला मराठी पूर्ण बोलता येत नसले तरी चांगल्या प्रकारे मराठी मला समजते असा उपरोधिक टोलाही त्यांनी मुख्यमंत्र्यांना यावेळी लगावला.