मुंबई: प्रतिनिधी
केवळ मीडियात येऊन अश्रू पुसणे आणि प्रत्यक्ष लोकांमध्ये जाऊन त्यांचे दु:ख जाणून घेणे वेगळे आहे. निसर्ग चक्रीवादळ असो किंवा तौक्ते वादळ आम्ही घटनास्थळी गेलो. आताही पूरग्रस्तांच्या मदतीसाठी धावून गेलो. त्यामुळे आम्ही रिकामटेकडा दौरा करत आहोत की फक्त टीका करत आहोत हे महाराष्ट्राची जनता पाहत असल्याचा पलटवार आज विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर केला.
प्रसारमाध्यमांशी बोलताना विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर खासदार राऊत यांच्या विधानांचा समाचार घेतला. राऊत यांनी बोलताना उक्ती आणि कृती याचे तारतम्य बाळगावे. एवढ्या पूरग्रस्त परिस्थितीत राऊत कधी पाण्यात उतरले का?, कुठे पाहणी करायला गेले का?, केवळ मीडियात येऊन वेगवेगळी वक्तव्य करणे आणि प्रत्यक्ष अश्रू पुसणे हे वेगळे आहे. तौक्ते निसर्ग वादळात आम्ही घटनास्थळी गेलो होतो, हे सुध्दा त्यामुळे दरेकर यांनी राऊत यांच्या निर्दशनास आणून दिले.
सर्वसामान्य जनतेच्या मनात काय आहे हे पाहावे
पुन्हा येईन, पुन्हा येईन हा विषय आता जुना झाला आहे. राऊत शिळ्या कढीला ऊत आणण्याचा प्रयत्न करत आहेत. विरोधी पक्षनेते महाराष्ट्राचे लोकनेते आहेत. नारायण राणे हे शिवसैनिक होते, ते त्यांनी कधी नाकारले नाही. राऊतांनी राणेंचे उदाहरण देत कार्यकर्त्यांना नवी ऊर्जा देण्याचे काम केलेय. त्यामुळे त्यांच्या बोलण्याला अर्थ नाही, असा टोला देत संकट काळात जनतेसाठी भाजप ग्राउंडवर काम करत असून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस ग्रासरूटचे नेते आहेत, त्यामुळे राऊत यांनी सर्वसामान्य जनतेचा कानोसा वा, असा उपरोधिक सल्लाही त्यांनी दिला.
फडणवीस सरकारप्रमाणे जीआर काढून मदत करावी
दरेकर म्हणाले, राज्याचे मुख्यमंत्री पंतप्रधानांवर काही बोलत नाहीत. त्यामुळे राऊतांच्या बोलण्याला महत्व नाही. पंतप्रधानांनी राज्याला ७०० कोटी रुपये दिले आहेत. राज्याला आणखी निधी मिळावा म्हणून भाजप पंतप्रधानांकडे मागणी करेल. पूरस्थिती निवळली असली तरी अजूनही पूरग्रस्त भागात भीषण परिस्थिती आहे. व्यापारी आणि शेतकऱ्यांचे जीवन उद्ध्वस्त झाले आहे. त्यामुळे देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळात ज्या प्रकारे जीआर काढून पूरग्रस्तांना मदत केली होती, तशाच प्रकारची मदत आता पूरग्रस्तांना अपेक्षित आहे, असल्याचे ते म्हणाले.