शासन कोणाचेही असो हमीभावाचा कायदा केल्याशिवाय राहणार नाही. असे आश्वासन वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी अकोला येथील प्रचार सभेत केले.
वंचितचे ॲड. प्रकाश आंबेडकर म्हणाले की, आजही बाजारात ५०० रुपये कमी भावाने कापूस विकत घेतला जातोय. १५०० ते २००० प्रमाणे सोयाबीन स्वस्त विकत घेतले जात आहे. हमीभावाचा कायदा असता आणि व्यापाऱ्याला दंडात्मक कारवाई असती की, तू जर दिलेल्या भावापेक्षा कमी भाव देत असशील तर तुला ५ वर्षाची शिक्षा होणार आहे. तर कोणत्या व्यापाऱ्याने कमी भावाने विकत घेतल असत ? असा सवालही यावेळी केला.
पुढे बोलताना प्रकाश आंबेडकर म्हणाले की, रणधीर सावरकर हे विद्वान आहेत. प्रचंड विद्वान आहेत. त्यांची प्रचंड विद्वानता त्यांनी सभागृहात दाखवली. त्यांनी शासन जे विदर्भात विहीर वाटप करतात त्या कशा ३० टक्क्यांनी कमी करता येतील याची मांडणी त्यांनी केली. त्यामुळे ३ वर्षांपूर्वी विहिरीसाठी मिळणारा निधी आणि आताचा निधी यात ३० टक्के कपात झाली असल्याची टीकाही यावेळी केली.
प्रकाश आंबेडकर पुढे म्हणाले की, जे काँगेसवाले कधीही औरंगजेबच्या कबरी शेजारी उभे राहायला तयार नाहीत, टीपू सुलतानचे नाव घ्यायला तयार नाहीत, एनआरसीच्या विरोधात आवाज उठवायला तयार नाहीत. अशा काँगेसवाल्यांवर मुस्लिम विश्वास ठेवायला लागले आहेत का ? असा सवालही यावेळी केला.
मुस्लिम समाजाला उद्देशून ॲड. प्रकाश आंबेडकर म्हणाले की, पाठिंबा मागणं हा गुन्हा आहे का ? मोहम्मद पैगंबर बिल मंजूर करण्यासाठी पाठिंबा मागणं हा गुन्हा आहे, तर १०० वेळा हा गुन्हा करू आणि मुस्लिमांना पाठिंबा मागू.
यावेळी मूर्तिजापूर आणि अकोला पूर्व मधील वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.