मागील काही दिवसांपासून ‘द कश्मीर फाईल्स’ चित्रपटावर संपूर्ण देशात वाद निर्माण झालेला असतानाच या चित्रपटाला महाराष्ट्रात कर मुक्त करण्याची मागणी भाजपाने केली. परंतु भाजपाच्या या मागणीच राज्य सरकारने नुकताच नकार दिला. त्यावरून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना प्रमुख स्व.बाळासाहेब ठाकरे यांच्यावरून मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे.
कश्मीर फाईल्स चित्रपट राज्यात करमुक्त करण्याची मागणी फेटाळताना अजित पवारांनी केंद्र सरकारने हा चित्रपट करमुक्त केल्यास संपूर्ण देशातच तो करमुक्त होईल, असे उत्तर देत भाजपालाच कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. यावरून विरोधकांनी सभागृहात चांगलाच गोंधळ घातला. यासंदर्भात देवेंद्र फडणवीसांना विचारणा केली असता त्यांनी शिवसेनेवर निशाणा साधला. फडणवीस हे सध्या दिल्ली दौऱ्यावर आहेत.
महाराष्ट्र सरकार हे काँग्रेसच्या दबावाखाली आहे. काश्मीरबाबत बाळासाहेब ठाकरेंची भूमिका आणि आजचे उद्धव ठाकरेंच्या सरकारचे वर्तन यात जमीन-आस्मानाचा फरक आहे. काश्मीरची काय अवस्था होती, हे ज्यांनी पाहिलंय त्यांना माहिती आहे. मी स्वत: वयाच्या १८ व्या वर्षी मी काश्मीरला गेलो होतो. तिथली दैना मी बघितली आहे. ज्या प्रकारे तिथे अत्याचार झालेत, ते मीही जवळून बघितले. असे देशातले सत्य एखाद्या सिनेमामुळे समोर येत असेल, तर काही लोकांना मिर्ची का लागते? ती यासाठी लागते की त्या वेळची त्यांची भूमिका ही किती संशयास्पद होती, जनविरोधी होती, देशविरोधी होती याचा पर्दाफाश होतो असे त्यांनी सांगितले.
चित्रपट टॅक्स फ्री करून वेदना दाखवता येत नाहीत अशा शब्दांत या प्रकरणावर प्रतिक्रिया देणाऱ्या संजय राऊतांना फडणवीसांनी खोचक शब्दात प्रत्युत्तर दिले असून राऊत यांच्या प्रतिक्रियेबाबत विचारले असता म्हणाले की, संजय राऊतांना काय सत्य माहिती आहे? ते कधी काश्मीरमध्ये गेले होते? या संघर्षाच्या काळात ते कधीच काश्मीरला गेले नाहीत. सत्य पहिल्यांदा बाहेर येतेय. ते बाहेर आल्यामुळे अलिकडच्या काळात संजय राऊत ज्यांची वकिली करतात, त्यांचे चेहरे उघडे पडत आहेत. त्याची चिंता संजय राऊतांना दिसते असा उपरोधिक टोला त्यांनी लगावला.