राज्य गुप्तचर विभागाच्या अहवाल फुटीवरून भाजपा आमदार सुधीर मुनगंटीवार आणि ॲड. आशिष शेलार यांनी स्थगन प्रस्ताव मांडल्यानंतर गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी विधानसभेत दिलेल्या उत्तरावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणाले की, गृहमंत्री वळसे-पाटील यांनी दिलेले संयत उत्तर आपल्याला आवडले. मी तुमच्या हेतूबद्दल अविश्वास दाखवित नाही. पण पाठविलेली प्रश्नावली आणि प्रत्यक्ष विचारलेले प्रश्न यामध्ये गुणात्मक फरक आहे. मात्र ते प्रश्न बदलले गेल्याचे माझ्या लक्षात आले. त्यामुळे प्रश्न बदलणाऱ्यांना माहित नाही मी कोणत्या घरातून आलोय ते असे सूचक वक्तव्य करत इशारा दिला.
मला पाठविण्यात आलेली प्रश्नावलीतील प्रश्न हे साक्षीदाराचे होते. त्यामुळे त्याला उत्तर देणार होतो. परंतु काही व्यस्त कार्यक्रमामुळे ते शक्य झाले नाही. मात्र जेव्हा मला शेवटचे पत्र मिळाले आण त्यात जबाब देण्यासाठी हजर होण्यास सांगितले. त्यावरून मला यामागे कोणी तरी असल्याचा संशय आला. त्यामुळे मी पदाचे प्रिव्हीलेज न घेता चौकशीला सामोरे जाण्याचा निर्णय घेत तसे जाहीर ही केले.
माझ्या घरी आलेल्या टीमने जे प्रश्न मला विचारले ते प्रश्न साक्षीदाराचे नव्हतेच मुळी. मी ही एक वकील आहे. त्यामुळे मला ते प्रश्न कोणासाठी आहेत हे लगेच समजले. ते प्रश्न एका आरोपीला म्हणून विचारण्यासाठीचे होते. तुम्ही ऑफिस सिक्रेसी ॲक्टचे उल्लंघन करत नाही का? असे प्रश्न विचारला गेला. यासह आणखी चार-पाच प्रश्न हे असेच होते. त्यामुळे मला पत्रकार परिषद घ्यावी लागली. परंतु प्रश्नावलीतील प्रश्न आणि प्रत्यक्ष विचारण्यात आलेले प्रश्न यात गुणात्मक फरक आहे. त्यामुळे या मागे कोण आहे? प्रश्न कोणी बदलले याचाही अंदाज आला. परंतु प्रश्न बदलणाऱ्यांना माहित नाही मी कोणत्या घरातून आलोय, माझे वडीलांना इंदिराजींनी दोन वर्षे तुरुंगात ठेवले होते. कोणत्याही गुन्ह्याशिवाय तर माझ्या काकू या १८ महिने तुरुंगात होत्या त्यांच्यावरही कोणताही गुन्हा नव्हता. त्यामुळे तुरुंगात राहण्याचे भय आम्हाला नाही आणि त्याला आम्ही घाबरत नाही असे जाहीरपणे सांगितले.